• Download App
    ५० डाॅक्टर, १०० नर्सेस पाठविण्यास केरळचा महाराष्ट्राला ‘नम्र’ ठेंगा... | The Focus India

    ५० डाॅक्टर, १०० नर्सेस पाठविण्यास केरळचा महाराष्ट्राला ‘नम्र’ ठेंगा…

    केरळच्या पन्नास पट रूग्ण आणि सुमारे सव्वा दोनशेपट मृत्यू महाराष्ट्रात झाले असताना अपुरया मनुष्यबळाचे कारण केरळने पुढे केले आहे. विशेष म्हणजे, केरळमध्ये १९९१ पासून आरोग्य कर्मचारयांची भरतीच झाले नसल्याचे त्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई, नवी दिल्ली : चायनीज व्हायरसला रोखण्यामध्ये उत्तम कामगिरी करत असलेल्या केरळने महाराष्ट्राला नम्र ठेंगा दाखविला आहे. डाॅक्टर्स आणि नर्सेस पाठविण्याच्या महाराष्ट्राच्या मागणीला नकार देताना प्रशिक्षित मनुष्यबळाची चणचण असे कारण केरळने पुढे केले आहे.

    “महाराष्ट्राची अडचण व गरज समजू शकते. पण केरळला ही मागणी पूर्ण करता येणे शक्य नाही. कारण केरळमध्येच १९९१ पासून आरोग्य कर्मचारयांची भरती झालेली नव्हती. या निमित्ताने आम्ही भरती केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला डाॅक्टर्स व नर्सेस पाठविणे खरोखरच शक्य नाही,” असे केरळच्या आरोग्य मंत्री श्रीमती के.के. शैलजा यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रासाठी नकारघंटा वाजविली.

    महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शैलजा यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डाॅ. टी.पी. लहाने यांनी शैलजा यांना पत्र पाठवून ५० अनुभवी डाॅक्टर्स व शंभर नर्सेस पाठविण्याची विनंती केली होती. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर सहाशे बेडच्या विशेष रूग्णालयासाठी हे डाॅक्टर्स व नर्सेस हवेत, असे त्यात नमूद केले होते. याशिवाय, एमडी-एमएस डाॅक्टरांसाठी दोन लाख रूपये,एमबीबीएस डाॅक्टरांसाठी ८० हजार व नर्सेससाठी ३० हजार रूपयांचे मासिक मानधन देण्याची तयारी दाखविली होती. तसेच त्यांचा निवास, न्याहारी-जेवण, प्रवास खर्च देण्याचीही तयारी दाखविली होती. एवढे असूनही केरळने महाराष्ट्राला ठेंगा दाखविला आहे.

    महाराष्ट्राची, विशेषतः मुंबई पट्ट्याची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. यावरून राज्य सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः आरोग्य सेवेचा बोजवारा उडत असल्याचे चित्र दिवसेंदिवस उभे राहिले आहे. अशास्थितीत केरळकडून मदतीचा हात मिळविण्याची आशा धुळीस मिळाली आहे.

    दोन राज्ये, दोन टोकांवर

    ३० मे रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत, महाराष्ट्रात ६२२२८ रूग्ण असून २०९८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २६९९७ रूग्ण बरेदेखील झाले आहेत. याउलट केरळमध्ये ११५१ रूग्ण असून मृत्यूसंख्या ९ इतकी आहे. ५६५ रूग्ण बरे झाले आहेत. थोडक्यात केरळच्या पन्नास पट रूग्ण आणि सुमारे सव्वा दोनशेपट मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??