कोरोना विरुद्धच्या लढ्यात सरकारी खर्च कमी करण्याची सूचना कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. पुढची दोन वर्षे सर्व प्रकारच्या जाहिरातींवर बंदी घालावी, असे गांधी यांचे म्हणणे आहे. ही सूचना आधीच मंदीच्या गर्तेत सापडलेल्या माध्यमांचे खच्चीकरण करणारी असल्याने या विरोधात प्रसारमाध्यमांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. न्यूज चॅनेल ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने याविरोधात टीका केली आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढील दोन वर्षांपर्यंत सर्व प्रकारच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची सूचना केली आहे. मंदीच्या गर्तेत सापडलेल्या माध्यमांचे खच्चीकरण करणारी ही सूचना असल्याचे न्यूज चॅनल्स ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने (एनबीए) म्हटले आहे.
केंद्र सरकार आणि विविध सरकारी संस्थांकडून माध्यमांना देण्यात येणाºया जाहिराती पूर्णपणे बंद कराव्यात, अशी सूचना सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला केलीय. प्रसार माध्यमांवर दोन वर्षांसाठी जाहिरात बंदी करण्याची मागणी अतिशय चुकीची आहे. सोनिया गांधींनी केलेल्या या सूचनेवर एनबीएकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येतेय, असं एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी पत्रकात म्हटलं आहे.
सर्वत्र रोगराईची स्थिती असताना माध्यमांचे प्रतिनिधी आपला जीव धोक्यात घालून आवश्यक ती माहिती देशातील नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत. अशा स्थितीत सोनिया गांधी यांनी केलेली सूचना ही माध्यमांचे खच्चीकरण करणारी आहे, असं रजत शर्मा यांनी सांगितलं. मंदीमुळे वृत्त वाहिन्यांचे उत्पन्न आधीच घटले आहे. त्यातच देशव्यापी लॉकडाऊनने उद्योग, व्यवसाय ठप्प असल्यानं माध्यमांसमोर आर्थिक संकट निर्माण झालं आहे. माध्यमांचे प्रतिनिधी, कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करत असून त्यांच्या सुरक्षिततेची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. यामुळे माध्यमांवर जाहिरात बंदी करण्याची ही योग्य वेळ नाही. असे केल्यास ही मनमानी ठरेल, असं रजत शर्मा म्हणाले. सशक्त आणि निर्भीड माध्यमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेली माध्यमांवरील जाहिरात बंदीची सूचना सोनिया गांधींनी मागे घ्यावी, अशी मागणी रजत शर्मा यांनी पत्रातून केली आहे.
सोनिया गांधी यांच्या सूचनेवर अद्याप सरकारकडून कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आली आहे. पुढची दोन वर्षे केवळ आरोग्यविषयक आणि कोरोनासंदर्भात जनजाृगती करणाऱ्या जाहिराती सरकारने प्रसारमाध्यमांना द्याव्यात, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.