विशेष प्रतिनिधी
दिल्ली : ३ मे नंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. उद्या (सोमवारी) पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सर्वधर्मियांनी देशाप्रती कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळला तसाच तो पुढे देखील पाळला तर करोनाविरुद्धचा लढा आपण निश्चित जिंकूत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोनाचा हा संसर्ग लवकरात लवकर रोखता यावा यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी देशात एकूण २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला होता .
मात्र, लॉकडाऊन असताना संसर्ग वाढतच असताना आता काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. ३ मे ला लॉकडाऊनची मुदत संपत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी उद्या (२७ एप्रिल) देशातील सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांतील एकूण सद्यस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपाययोजनांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.