विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानातील भीलवाडा कोरोनाचा वेगळ्याच कारणासाठी कोरोनाचा केंद्रबिंदू बनले आहे. येथे एका डॉक्टरपासून सुरू झालेले संक्रमण बिन लक्षणांचे ८३ जणांपर्यंत पोचले आहे. बांगडमधील हा डॉक्टर आधी सौदीमधून आलेल्या एका व्यक्तीला भेटल्याचे स्पष्ट झाले आहे. विना लक्षण कोरोना फैलावाच्या घटनांनी प्रशासन चक्रावले असून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्हा सील करण्यात आला आहे. ३ ते ३० एप्रिल पर्यंत जिल्ह्यात १००% बंद पाळण्यात येईल. सर्व सामाजिक संस्था, एनजीओ एवढेच काय पण पत्रकार, मीडिया यांच्यावर देखील ही बंदी लागू असेल. या काळात प्रशासन मीडियाला माहिती देणार आहे. सर्वांचे कर्फ्यू पास देखील रद्द करण्यात आले आहेत. पुढील १० दिवस भीलवाडा साठी फार महत्वाचे आहेत कारण येथे सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मृतांची संख्या दोनच असली तरी विना लक्षण कोरोना फैलावाचे प्रमाण मोठे आहे. वैद्यकीयदृष्ट्या ही अनाकलनीय घटना आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा १००% बंद राहणार आहे.
जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद राहतील. जिल्ह्याच्या सीमा बंद करून बाहेर जाण्यासही १००% प्रतिबंध असेल, असे जिल्हाधिकारी राजेंद्र भट यांनी सांगितले. प्रसंगी लष्कराच्या तुकड्यांनाही पाचारण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी भीलवाडा जिल्ह्यात २८ लाख लोकांचे स्किनिंग पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. संपूर्ण राजस्थानात ३ कोटी २६ लाख लोकांचे स्किनिंग केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
राजस्थानचे अतिरिक्त मुख्य सचिव रोहित कुमार सिंग यांनी वास्तव माहिती दिली. १४ हजार लोकांना एन्फ्लूएन्झा सदृश्य आजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- भीलवाडा मधील ६४४५ लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्यावर मोबाईल अँपद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.
- कोरोनाचे सामाजिक संक्रमण रोखण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.
- बांगडच्या डॉक्टरची केस लक्षात आल्यानंतर भीलवाडातील सुमारे २००० वैद्यकीय स्टाफची तपासणी करण्यात आली आहे.
- बांगड हॉस्पिटलच्या संपर्कात आलेल्या ९०० जणांचा शोध घेऊन त्यांचे सँपलिंगचे काम सुरू आहे. संबंधितांना होम क्वारंटाइनच्या सूचनाही देण्यात येत आहेत.