विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र शासनाने राजस्थान राज्यातील कोटा या ठिकाणी जाऊन अनेक विद्यार्थ्यांना परत आणले, हे एक चांगले काम झाले आहे. मात्र, यात काही नियोजन असल्याचे दिसून आले नाही. संवेदनशील असलेल्या शहरातील लोकसंख्या तीस टक्के कमी केल्यास किंवा स्थलांतरित केल्यास कोरोनावरती नियंत्रण मिळवता येईल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यासाठी या शहरातील 30 टक्के लोकसंख्या स्थलांतरित करण्याची गरज आहे. त्यासाठी किमान तीन दिवसांसाठी महाराष्ट्रापुरतं रेल्वेसेवा सुरू करावी लागेल. भुसावळ, गोंदिया, नागपूर, नांदेड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गपर्यंत रेल्वे वाहतूक सीमावर्ती भागापर्यंत चालवण्याची गरज आहे.
यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या गावी गेल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रवाशांना ताब्यात घेऊन क्वांरोनटाईन केल्यावरच त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवल्यास गावकऱ्यांमध्ये अशा लोकांप्रती भीती राहणार नाही. शिवाय ज्या लोकांकडे खाजगी वाहने, बसेस आहेत या बसेसमधूनही अनेक लोकांना स्थलांतरित करण्यात यावे.
ज्या ठिकाणी रेल्वे सुविधा नाही अशा ठिकाणी या बसेस पाठवून देणे गरजेचे आहे. असे नियोजन केल्यास दाट वस्ती असलेल्या शहरांमधील लोकसंख्या कमी करून कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल. राज्य सरकारने असे नियोजन केले तर कोरोनावर मात करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असल्याचे आपण मान्य केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.