विशेष प्रतिनिधी
पुणे : दारु दुकानांपासून राज्यात सगळ्याच गोष्टी सुरु होत असताना आता मंदिरांचे दरवाजे उघडण्यासही परवानगी द्या, अशी मागणी राज ठाकरे यांच्या मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
“महाराष्ट्रात सध्या सगळ्याच गोष्टीना सुरवात झाली आहे. सगळ्या प्रकारची दुकाने चालू झाली आहेत. घरातून बाहेर पडलो तर रस्त्यावर गर्दी दिसते. मोलमजुरी करणाऱ्या परप्रान्तीय मंडळींसाठी गाड्याही सुरु झाल्या. ऑनलाईन सगळ्या गोष्टी मिळू लागल्या आहेत. दारूची दुकाने तर दोन – पाच किलोमीटरच्या रांगा लावून सुरु आहेत .आणि सुव्यवस्थेसाठी प्रत्येक दुकाना बाहेर चार-पाच पोलीस रांगा लावताना दिसत आहेत,” असे मनसेचे म्हणणे आहे.
“असं सगळं सुखदायक चित्र दिसत असताना आणि या सगळ्या सुरु असणाऱ्या गोष्टी मुळे करोनाचा प्रसार होत नसताना आणि बऱ्यापैकी जनताच करोनाचा प्रसार होऊ नये या साठी काळजी घेत असताना. योग्य त्या नियम अटी घालून देत राज्यातील मंदिरे देखील मुक्त केली पाहिजे,” अशी मागणी मनसेने केली आहे. या बाबत योग्य निर्णय त्वरित घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.