विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत किंवा स्वयंपूर्ण भारत यासाठी दिलेली हाक, त्यापाठोपाठ पाच दिवस उचललेल्या ऐतिहासिक पावलांची शृंखला भारताच्या इतिहासातला महत्वाचा टप्पा म्हणून स्मरणात ठेवली जाईल, असे मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
जावडेकर म्हणाले, संकट हे देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाची एकापेक्षा अनेक पद्धतीने परीक्षा घेत असते. या परीक्षेत भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकर आणि निर्णायक कृती करत एक उदाहरणच घालून दिले. गतीमान नेतृत्व तातडीच्या आव्हानावर विचार करण्याबरोबरच देशाला पूवीर्पेक्षा अधिक बळकट करण्यासाठी सज्ज करते, असेही ते म्हणाले.
भारताच्या यशोगाथेसाठी महत्वाच्या असलेल्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात सुधारणा आणण्यात आल्या आहेत. गरीब, फेरीवाले, स्थलांतरित मजूर, भारताच्या विकासाचे सुकाणु ज्यांच्या हाती आहे अशा या सर्वांसाठी अनेक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. एक देश एक रेशन कार्ड ते सर्व स्थलांतरितांना मोफत अन्नधान्य, अल्प कर्ज घेतलेल्या मुद्रा लाभार्थीसाठी व्याजदरात सवलत ते फेरीवाल्यांसाठी प्राथमिक खेळते भांडवल, मनरेगा तरतुदीसाठी चालना ते आरोग्य आणि वेलनेस केंद्र सबलीकरण, कोविड-19 चा सर्वात जास्त आर्थिक फटका झेलणाऱ्यांना उभारी देऊन त्यांना बळकट करण्यावर या आर्थिक पॅकेज मधे भर देण्यात आला आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग किंवा एमएसएमई क्षेत्र हे या क्षेत्रांच्या रोजगारविषयक स्वरूपामुळे महत्वाचे असून भारताच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्वाचे क्षेत्र आहे. कोणत्याही तारणाशिवाय एमएसएमई साठी 3 लाख कोटी रुपयांच्या सवलतीच्या व्याजदरातल्या पतहमीमुळे या क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.