विशेष प्रतिनिधी
पुणे : जम्मू काश्मीर चे 1 हजार 27 विद्यार्थी व नागरिक विशेष रेल्वेने नुकतेच पुण्यातून रवाना झाले. काश्मिरी विद्यार्थी व नागरिकांची पुरेशी संख्या झाल्यावर रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वे मार्ग उपलब्ध करुन दिल्यानंतर पुण्यातून बुधवारी ही रेल्वे मार्गस्थ झाली.
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या जम्मू काश्मीर मधील या विद्यार्थी व नागरिकांना त्यांच्या राज्यात अटी-शर्तींची पूर्तता करून जाऊ देण्याची प्रक्रिया पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पार पाडली. संबंधित राज्यांनी परवानगी दिल्यानंतर विशेष रेल्वेने हे नागरिक रवाना करण्यात आले.
पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, अहमदनगर, भिवंडी, रायगड आदी जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांचा यात समावेश होता. सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी या नागरिकांकडून हमीपत्र भरुन घेणे, आरोग्य तपासणी करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली. हे विद्यार्थी व नागरिक यांना फूड पॅकेट व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सरहद संस्थेचे संजय नहार यांनी केली.