विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊन उठविणार की वाढविणार याची देशभर चर्चा सुरू असताना पंतप्रधान कार्यालयाने मात्र कोरोनानंतरची आर्थिक परिस्थिती सावरण्याच्या दृष्टीने काम करण्यास सुरवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांची महत्त्वाच्या खात्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. ए. के. शर्मा यांची सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव म्हणून तर तरुण बजाज यांची अर्थ मंत्रालयात अर्थ व्यवहार सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी मोदींचे अतिशय विश्वासातील मानले जातात.
या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या मंत्रालयामध्ये करण्यात आल्या आहेत, त्या मंत्रालयांना पुढील काळात महत्त्व प्राप्त होणार असल्याची राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. किंबहुना मोदींचा फोकस देशाची अर्थव्यवस्था सुधारताना लघु आणि मध्यम उद्योगांना वाचवून तेथील उत्पादन वाढीवर असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. शर्मा आणि बजाज अनुक्रमे लघु, मध्यम उद्योग मंत्रालय आणि अर्थमंत्रालयातून देशाच्या economic revival चे तपशीलवार नियोजन आणि अंमलबजावणी करतील. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या खांद्यावर मोदींनी ही जबाबदारी टाकली आहे.
शर्मा हे पंतप्रधान कार्यालयातले सर्वात अधिकारक्षम अधिकारी मानले जातात. मोदींच्या मुख्यमंत्रीपदाच्या सुरवातीपासून म्हणजे २००१ पासून ते मोदींसमवेत कार्यरत आहेत.
या दोन अत्यंत महत्त्वाच्या बदल्यांबरोबरच अन्य २३ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्तरांवर बदल्या करण्यात आल्या आहेत. आर्थिक नियोजनाच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर देण्याचे या सर्व सचिवांचे वेगवेगळ्या खात्यामधून काम सुरू राहील.
लॉकडाऊनचा सर्वांत मोठा फटका लघु आणि मध्यम उद्योगांना बसला आहे. २५% उद्योगांसाठी तर हा फटका जीवघेणा आहे. त्याचा रोजगारावर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे या उद्योगांचे पुनरुज्जीवन करून देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यास सरकारचे प्राधान्य असल्याचे यातून दिसते.
सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांचा वाटा
- भारतीय अर्थव्यवसथेत सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांचा जीडीपीमधील वाटा २१ ते २५% आहे.
- १२ कोटी लोकांना या उद्योगांची रोजगार देण्याची क्षमता आहे.
- देशाच्या एकूण उत्पादनापैकी ३३.४% उत्पादन सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमधून होते. तसेच ४५% निर्यातक्षम उत्पादनही याच उद्योग क्षेत्रातून होते.