विशेष प्रतिनिधी
मुंबई : पालघर येथील साधूं:ना जमावाने पोलिसांसमोर ठेचून मारल्याची दुर्दैवी घटना एप्रिलमध्ये महाराष्ट्रात घडली. या घटनेतील आरोपी चीनी विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या हे आरोपी वाडा पोलिस ठाण्याच्या कोठडीत आहेत. या ठिकाणी या आरोपींची चाचणी घेण्यात आली. संबंधित आरोपी चीनी विषाणू बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आले असून जेजे हॉस्पीटलच्या कैदी वॉर्डात हलवण्यात आले आहे. कोठडीत असताना या आरोपीने अन्य 20 आरोपींना बाधित केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालघर हत्याकांडातील या सर्व आरोपींना एकाच कोठडीत ठेवण्यात आले होते. पालघर हत्याकांडाशी संबधित अटक केलेल्या शंभरपेक्षा जास्त संशयितांपैकी हा एक आहे.
महाराष्ट्र सीआयडीने अन्य पाच आरोपींना अटक केल्यानंतर ही गोष्ट उघड झाली. आतापर्यंत एकूण 115 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यातल्या 9 अल्पवयीन आरोपींना भिवंडीच्या रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे. सीआयडीचे उपअधिक्षक इरफान शेख यांनी सांगितले की, आरोपींना डहाणू कोर्टात हजर करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांना 13 मेपर्यंत सीआयडी कस्टडी सुनावण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावाच्या हद्दीत 70 वर्षीय साधू कल्पवृक्ष गिरीमहाराज, पस्तीस वर्षीय सुशीलगिरी महाराज आणि या दोघांचा 30 वर्षीय वाहनचालक नीलेश तेलगडे यांची जमावाने काठ्यांनी आणि लाथाबुक्यांनी ठेचून हत्या केली होती. हे तिघे त्यांच्या वरीष्ठ साधुंच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्यासाठी कांदिवली येथून सुरतला निघाले होते. मुले पळवणाऱ्या टोळीचे हे सदस्य असल्याच्या संशयातून या तिघांना मारल्याचा दावा पहिल्यांंदा केला गेला. मात्र नंतर हे प्रकरण तेवढ्यापुरते मर्यादीत नसून अन्य धर्मियांचा हस्तक्षेप आणि त्याला मिळालेली राजकीय साथ यामागे असल्याचे आता स्पष्ट होत आहे.