• Download App
    देहू,आळंदी पालखी सोहळयाचे स्वरूप येत्या दोन दिवसात ठरणार | The Focus India

    देहू,आळंदी पालखी सोहळयाचे स्वरूप येत्या दोन दिवसात ठरणार

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्राचे वैभव मानली जाणारी आषाढी वारीची साडेसातशे वर्षांपासून अखंड राहिलेली परंपरा यंदा चिनी विषाणूच्या उद्रेकामुळे संकटात सापडली आहे. देशभरातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना घेऊन शेकडो दिंड्या संत ज्ञानेश्वरांच्या आळंदीतून आणि संत तुकारामांच्या देहूगावातून पंढरपुरकडे प्रस्थान ठेवत असतात. यंदा या वारीत किती वारकऱ्यांना सहभागी करुन घ्यायचे, वारीचे स्वरुप कितपत भव्य ठेवायचे, या संबंधीचा निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाणार आहे.

    पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. 12) निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे, संजय मोरे आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी ही माहिती दिली.

    जिल्हाधिकारी राम म्हणाले की, वारकरी संप्रदायाची परंपरा असणाऱ्या ऐतिहासिक अशा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. कोरोनाच्या संसर्गाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार टाळेबंदीचे स्वरूप पाहता आळंदी ते पंढरपूर असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखीसोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

    सुरक्षित अंतराबाबतची शासनाची नियमावली, टाळेबंदीची परिस्थिती व येत्या काळातील संभाव्य चित्र, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळयाचे स्वरूप नेमके कसे असावे व त्याचे नियोजन कशा प्रकारे करावे या बाबत शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल. शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून आम्ही कमी संख्येत पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवणार आहोत, असे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी सांगितले.

    देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे म्हणाले की, आषाढी वारीची परंपरा अबाधित रहावी यासाठी शासनाकडून सहकार्य अपेक्षित आहेत. आम्ही समाजाची काळजी घेत तसेच शासनाचा नियमावलीचे पालन करून या पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवू.

    Related posts

    Thackrey brothers तारीख बदलून मोर्चा हिंदी सक्तीच्या विरोधासाठी, की ठाकरे बंधूंच्या ऐक्यासाठी??

    माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची मराठी माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!!

    Malegaon sugar factory election बारामती नाही उरली एकतर्फी, हा खरा माळेगावच्या निवडणुकीचा संदेश!!