विशेष प्रतिनिधी
मुंबई : एका घरगुती समारंभात व्यस्त असल्याने मला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षि शाहू महाराजांबद्दल केलेल्या ट्विटची कल्पना नव्हती. त्यानंतर त्यांनी ट्िवट डिलीट केल्याने मी काही तेव्हा बोललो नाही, अशी प्रतिक्रिया छत्रपती शाहू महाराजांचे वंशज व राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. छत्रपती घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे मला कुणी शिकविण्याची गरज नाही. छत्रपतीविषयी जेव्हा एखादे प्रकरण समोर येते, तेव्हा सर्वात आधी मी भूमिका घेतली आहे, असेही ते टीकाकारांना उद्देशून म्हणाले.
स्मृतिदिनी राजर्षि शाहू महाराजांबद्दल ट्विट करताना फडणवीस यांनी थोर सामाजिक कार्यकर्ते असा शब्दप्रयोग केल्याने ६ मे रोजी सोशल मीडियावर फडवणीसांविरुद्ध टीकेच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या. मात्र, त्यावर दिवसभर संभाजीराजे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने काहीजणांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. आज (७ मे) मात्र सकाळी त्यांनी ट्विट करून फडणवीसांकडून माफीची मागणी केली होती. त्यावर लगेचच फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले आहे.
छत्रपती संभाजीराजेंनी लिहिलेली पोस्ट पुढीलप्रमाणे…
“छत्रपती_घराण्याची_प्रतिष्ठा_जपण्यासाठी_मी_काय_केलं_पाहिजे_हे_मला_कुणीही_शिकवण्याची_गरज_नाही!
छत्रपतीं विषयी जेंव्हा केंव्हा एखादं प्रकरण समोर आलं, तेंव्हा सर्वात आधी मी भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळी मी पुढे असतो, यापुढेही असेन. शिवरायांची तुलना नरेंद्र मोदींसोबत जेंव्हा केली गेली तेंव्हा देशात सर्वात आधी मी बोललो होतो. सिंदखेड राजा मधील माझ्या चालू भाषणात जेंव्हा मला हे कळलं तेंव्हा तात्काळ या घटनेचा जाहीर निषेध मी केला होता. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला तेंव्हा मी त्यांना माफी मागायला भाग पाडलं होतं. मग इतरांचं काय घेऊन बसलाय?
काल माझ्या घरगुती कार्यक्रमा मध्ये व्यस्त असल्याने, समाज माध्यमांमध्ये घडत असलेली चर्चाही मला माहिती नव्हती. त्याआधी दिवसभरात माझ्या सहकाऱ्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनाची तसेच आमच्या चिरंजीवांच्या वाढदिवसाची पोस्ट करायला सांगितली होती.
संध्याकाळी जेंव्हा मी फोन चालू केला तेंव्हा लोकमतच्या पत्रकाराचा फोन आला होता. त्यांना मी प्रतिक्रिया सुद्धा दिली. तोपर्यंत ते वादग्रस्त ट्विट डिलिट केलं गेलं होतं. म्हणून मी त्यावर काही बोललो नव्हतो. तरीही मी लोकमत ला प्रतिक्रिया दिली.
शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांच्या चरित्रातील आदर्शांवर चालण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणूनच, दिल्ली मध्ये ऐतिहासिक शिवजयंती साजरी केली. राष्ट्रपती असतील किंवा परदेशी राजदूत असतील या सर्वांना महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला मी भाग पाडले. आज जगभर त्या शिवजयंती ची दखल घेतली जात आहे.
संसदेच्या प्रांगणात राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्यात देश भरतील सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलं होतं. जवळपास 70 खासदार जमले होते. शाहू महाराजांवरील जयसिंगराव पवारांचे हजारो पुस्तके मी देशी विदेशी अतिमहत्वाच्या व्यक्तींना भेट म्हणून दिले आहेत. त्यातून महाराजांचा इतिहास पोचवण्यास मदतच होत आहे.
महाराष्ट्रात सारथी संस्थेच्या स्वायत्ततेसाठी आंदोलन उभं केलं. ते राजर्षी शाहू महाराजांचे जिवंत स्मारक आहे. त्याला जिवंत ठेवण्यासाठी मी रस्त्यावर उतरलो होतो. राजर्षी शाहू महाराजांनी, बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी जे जे केलं, त्या गोष्टींमधून आदर्श घेऊन मी कार्य करत असतो. मराठा आरक्षणाच्या लढयात मी त्याच उद्देशाने उतरलो होतो. आजही आहे. कोल्हापुरातील महापुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या करत असताना मी स्वतःचा विचार करत नाही. कारण, त्यावेळी माझ्यासाठी देशहित , समाजहित महत्वाचे असते.
सांगायचा मुद्दा एवढाच आहे की, प्रत्यक्ष कृतीतून काम करून दाखवण्याचा माझा स्वभाव आहे. शिवरायांपासून , राजर्षींपर्यंत माझ्या सर्व पूर्वजांनी हीच शिकवण दिली आहे… ’’
माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 7, 2020
छत्रपतींचे वंशज भाजपसोबत…
दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे हे नुकतेच भाजपचे राज्यसभा खासदार बनले आहेत, तर दुसरे वंशज शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचेच आमदार आहेत. छत्रपती संभाजीराजेंची राज्यसभा मुदत पुढील वर्षी संपत आहे.