विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना विरोधातील लढाई ही भारतीयांची चळवळ झाली आहे. जगासाठी भारतीयांची लढाई प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात काढले.
मोदी म्हणाले, की मन की बातसाठी लॉकडाऊनच्या काळात फोनकॉल, सूचनांची संख्या खूपच जास्त आहेत. कोरोनाची लढाई आता भारतीयांची लढाई झाली आहे. ही लोकांनी चालवलेली चळवळ आहे. भविष्यात याची चर्चा होताना भारतीयांच्या प्रेरणेची नक्की चर्चा होईल. प्रत्येक भारतीय कोरोना विरोधातील लढाईचे नेतृत्व करत आहे.
प्रत्येक भारतीय एकमेकांची विविधतेने मदत करतोय. भारतीयांची ही एकजूट संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे.
सरकारने एक डिजिटल पोर्टल तयार केले आहे. सगळे म्हणजे सव्वा कोटी कोविड वॉरियर्स covidwarriors.co.in या पोर्टलशी जोडले गेले आहेत.
आपल्या जीवनशैलीत बदल होतोय. तंत्राने तर हे सगळे बदलून गेले आहे. आपण सगळे मेहनत करत आहोत. लाइफलाइन उडानमार्फत ५ लाख टन वैद्यकीय सामग्री पोचवली आहे. रेल्वे, टपाल विभाग कार्यक्षमतेने काम करत आहे. देश एक टीम म्हणून काम करतोय. राज्य सरकारेही कोरोना विरोधातील लढाईत मोठे योगदान देत आहे. कोरोना वॉरिअर्सच्या संरक्षणासाठी नव्या अध्यादेशाचे देशभर स्वागत होतेय.
Here is #MannKiBaat April 2020. https://t.co/tkteUgjck9
— Narendra Modi (@narendramodi) April 26, 2020
शेतकरी, व्यापारी, पोलिस, सफाई कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी यांच्या बाबत देशात आभाराची भावना आहे. पोलिसांचा मानवी चेहरा या संकटकाळात पुढे आला आहे. पोलिसांविषयी देशभर सकारात्मक भावना आहे.
भारताने आपल्या संस्कृतीनुसार संपूर्ण जगाला औषधपुरवठा केला आहे. दुसऱ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष thank you India म्हणतात त्यावेळी आपल्याला आनंद होतो. आपल्या पारंपरिक आयुर्वेदिक औषधपद्धतीतून काही सकारात्मक रिझल्ट येताहेत. आपल्या आयुर्वेद पद्धतीला देशातील युवा पिढीने संपूर्ण जगाला समजावून सांगावे. आयुर्वेद जगाच्या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे.
तसाच मास्क, चेहरा झाकणे ही सवय देखील आपल्या जीवनशैलीचा भाग झाली पाहिजे. रोगापासून स्वत:चा आणि समाजाचा बचाव करा.
आजच्या अक्षयतृतीया पर्वात पर्यावरण रक्षण आणि दानाचे महत्त्व ओळखून आपली वर्तणूक ठेवली पाहिजे. भगवान बसवेश्वर जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन संदेशाचे पालन करण्याचा संकल्प करू या. रमजानच्या पवित्र महिन्यात इबादत करू या.
आपण अतिआत्मविश्वासातून कोणतीही आततायी कृती करू नये. आपण कोठेही निष्काळजी राहायला नको. दो गज दूरी बहोत जरूरी ही माझी सूचना लक्षात घ्या.