डीएचएफएलच्या वाधवान कुटुंबाला दिलेली प्रवासाची परवानगी आणि त्यावरून गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना वाचविण्याचा प्रयत्न यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मु्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : डीएचएफएलच्या वाधवान कुटुंबाला दिलेली प्रवासाची परवानगी आणि त्यावरून गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना वाचविण्याचा प्रयत्न यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मु्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यावर टीका करताना शेट्टी म्हणतात, न्यूझीलंडमध्ये लॉकडाउनचा नियम मोडणार्या आरोग्य मंत्र्यांचं तिकडच्या राष्ट्राध्यक्षांनी पद काढून घेतलं. उद्धवजी आम्ही तुमच्यासोबत आहोत, मात्र आपण अमिताभ गुप्ता यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत दिले असते तर तुमचा कणखरपणा दिसला असता.
राज्यात चिनी विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आलेलं आहे. मात्र काही दिवसांपूर्वी आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआय व इडीच्या रडारवर असलेल्या वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जाण्यासाठी राज्याचे गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी एक परवानगीचं पत्र दिलं होतं. लॉकडाउन काळात वाधवान कुटुंबियांना प्रवासाची परवानगी कशी मिळाली यावरुन राज्यात बराच गदारोळ माजला होता.
यावर तात्काळ पावलं उचलत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश दिले. मात्र गुप्ता यांच्यावर कारवाई करण्यात चालढकल केली जात आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांवर कारवाईचे अधिकार आपल्याकडे नसल्याचे राज्य सरकार म्हणत आहे. परंतु, कायदेतज्ज्ञांच्या मते राज्य सरकार बडतर्फे करत नसेल तरी निलंबनाची कारवाई करू शकते. त्याचबरोबर मंत्रालयातील अधिकार्यांवर चौकशीची जबाबदारी देण्याऐवजी माजी न्यायाधिशांकडून ही चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.