चिनी विषाणूमुळे बाधीत होणाऱ्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कामाला लागली आहे. कर्जे स्वस्त करण्यासोबतच बाजारातील पतपुरवठा वाढवण्यावर आरबीआयने भर दिला आहे. या उपायांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या उपायांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. या उपाययोजनांमुळे तरलता वाढेल आणि पतपुरवठ्यात सुधारणा होईल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
”रिझर्व बँकेच्या आजच्या घोषणांमुळे तरलता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि पतपुरवठ्यात सुधारणा होईल. या उपायांमुळे आपल्या लघूउद्योजकांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना, शेतकरी आणि गरिबांना मदत होईल. तसेच डब्ल्यूएमए मर्यादा वाढवल्याचाही सर्व राज्यांना लाभ होईल, असे पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.
रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज देशातील अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी दुसरे पॅकेज जाहीर केले. ते यावेळी म्हणाले होते की,देशातील परकीय गंगाजळीचे प्रमाण अद्याप उत्तम आहे, सध्या देशात 476.5 कोटी डॉलर्स इतका परकीय चलनसाठा आहे, जो आपल्या 11.8 महिन्यांच्या आयातीएवढा आहे. 6 फेब्रुवारी ते 27 मार्च या कालावधीत, आपल्या जीडीपीच्या 3.2 टक्यांएवढी रक्कम रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेत घातली आहे; तेव्हापासून, सरकारच्या स्थिर खचार्मुळे बँकिंग व्यवस्थेत तरलतेचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे.
रोखीच्या व्यवहारांमधील तात्पुरता असमतोल दूर करण्यासाठी आरबीआय राज्यांना देत असलेल्या मदतीमध्ये 60 टक्क्यांची वृद्धी करण्यात येत आहे. यामुळे, राज्यांना कोविड19 संदर्भात उपाययोजना करता येतील आणि बाजारातून पैशांची उचल करण्याविषयी, अधिक चांगल्या योजना आखता येतील, असेही दास यांनी सांगितले.