- आतापर्यंत कर्ज वसुलीसाठी ९९६७ अर्ज विविध न्यायाधिकरणांकडे सादर. ३५१५ गुन्हे दाखल
- आतापर्यंत नीरव मोदी, मेहुल चौक्सी व विजय मल्ल्या यांच्या १८,३३३ कोटींची सर्व प्रकारच्या (चल, अचल) मालमत्ता जप्त.
- प्रमुख ५० कर्जबुडव्यांची नावे नोव्हेंबर २०१९मध्येच आणि नंतर मार्च २०२०मध्येही संसदेत जाहीर केल्याकडे वेधले लक्ष
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराविरोधात लढण्यास तुमचा पक्ष अपयशी का ठरला याचे जरा आत्मपरीक्षण करा अशा शब्दांत अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांनी कॉंग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना सुनावले आहे.
देशात बँकेचे कोट्यवधी रुपये बुडविणारया थकबाकीदारांची नावे केंद्र सरकार लपवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. आता भारतीय रिझर्व्ह बँकेने नीरव मोदी, मेहुल चोकसीसह भारतीय जनता पक्षाच्या मित्रांची नावे ‘बँकेच्या चोरांच्या’ यादीत समाविष्ट केली आहेत असा आरोप संसदेत विचारलेल्या प्रश्नाचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी केला आहे.
यावर ट्विटरवरून सडेतोड उत्तर देताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, कॉँग्रेस आणि राहूल गांधी यांनी अगोदर यावर आत्मचिंतन करावे की व्यवस्था बदलण्यासाठी काही विधायक पावले उचलण्यात ते का कमी पडले. सत्तेवर असताना आणि आता विरोधी पक्षात असतानाही कॉँग्रेसने भ्रष्टाचाराविरोधातील लढाईसाठी काय केले?
कधी इच्छाशक्ती दाखविली का?कॉँग्रेस सरकारच्या दहा वर्षांच्या काळात देशात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मोठी वाढ झाली. टू जी, कोलगेट यासारख्या घोटाळ्यातून काही हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले होते.
मला संसदेमध्ये माहिती दिली नाही, पण रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली, हा राहुल यांचा दावाही सीतारामन यांनी खोडून काढला. १८ नोव्हेंबर २०१९ रोजी लोकसभेत प्रश्न क्रमांक ५२ आणि १६ मार्च २०२० रोजी लोकसभेतील प्रश्न क्रमांक ३०५ मध्ये जाणीवपूर्वक कर्ज फेडत नसलेल्या प्रमुख ५० कर्जबुडव्यांची नावे जाहीर केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Shri @RahulGandhi MP (LS) and Shri @rssurjewala spokesperson of @INCIndia have attempted to mislead people in a brazen manner. Typical to @INCIndia, they resort to sensationalising facts by taking them out of context. In the following tweets wish to respond to the issues raised.
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) April 28, 2020
सीतारामन यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांवर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. ते पुढीलप्रमाणे :
- आतापर्यंत कर्ज वसुलीसाठी ९९६७ अर्ज विविध न्यायाधिकरणांकडे सादर. ३५१५ गुन्हे दाखल
- आतापर्यंत नीरव मोदी, मेहुल चौक्सी व विजय मल्ल्या यांच्या १८३३३ कोटींची सर्व प्रकारच्या (चल, अचल) मालमत्ता जप्त.
- विजय मल्ल्या प्रकरणात कारवाई: ९७३३ कोटींची संपत्ती जप्त. फरार गुन्हेगार म्हणून जाहीर. ब्रिटनच्या हायकोर्टामध्ये खटला चालू. प्रत्यापर्ण करण्याची ब्रिटनला विनंती. कायदेशीर प्रक्रिया चालू
- मेहूल चौक्सी प्रकरणी कारवाई : २५३४.७ कोटींची संपत्ती जप्त. रेड काॅर्नर नोटीस जारी. अँटिग्वाला प्रत्यार्पण करण्याची विनंती. फरार गुन्हेगार म्हणून जाहीर
- नीरव मोदी प्रकरणी कारवाई : २३८७ कोटींची संपत्ती जप्त. त्यामध्ये ९६१.४७ कोटींच्या परदेशातील मालमत्तांचाही समावेश. ५३.४५ कोटींच्या लक्झुरियस मालमत्तांचा लिलाव. सध्या ब्रिटनमधील तुरुंगात रवानगी