विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तबलिगी जमातच्या मरकजमधील घातक ठरणाऱ्या कारवायांची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. तबलिगच्या कार्यक्रमात भाग घेऊन महाराष्ट्रात परत आलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्या. महाराष्ट्रात यातील ९२ लोक आल्याची केंद्राची माहिती आहे. त्याच बरोबर गेले दोन दिवस कोरोनाग्रस्तांची संख्या एकदम वाढती आहे. महाराष्ट्र यात पहिल्या नंबरवर आहे. त्याला अटकाव करण्याच्या उपाय योजनांबद्दलही मोदी – ठाकरे यांच्यात चर्चा झाली.
दरम्यान, मरकजमध्ये सहभागी झालेल्या पुणे जिल्ह्यातील 40 लोकांना पोलिसांनी आतापर्यंत शोधून काढल्याची माहिती आहे. पोलिसांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यात पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा आणि पुणे शहरातील मुस्लीमांचा समावेश आहे. यातील 32 जण पिंपरीतले आहेत. केंद्र सरकारने देशातल्या प्रत्येक राज्याला दिल्लीतील कार्यक्रमाला सहभागी झालेल्या मुस्लिमांची नाव-पत्त्यासह यादी कळवली आहे. त्यानुसार तपास यंत्रणा शोध घेत आहेत. मात्र वैद्यकीय कारणांसाठी चालू असलेल्या या तपासात कट्टरपंथीय अडथळे आणत असल्याने पोलिसांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यातील काही जणांची माहिती पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून शोधली आहे.
तबलिग जमातच्या मरकजमधून नाशिकमध्ये आलेल्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.