विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्याच्या सुरवातीस बेरोजगारीच्या टक्क्याने शिखर गाठले असताना आता मात्र ग्रामीण अर्थव्यवस्था अंशत: सुरू होताना बेरोजगारीची टक्केवारी घटताना दिसत आहे. रोजगाराच्या संधी पुन्हा उपलब्ध व्हायला सुरवात झाली आहे.
लॉकडाऊनची नियमावली कडक होत असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रोजगाराला मोठा फटका बसला होता. ५ एप्रिलला संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचे प्रमाण ३०% वर पोहोचले होते. त्यानंतर हा आकडा टप्प्या टप्प्याने घटत जाऊन २६ एप्रिल हा आठवडा संपताना २१.५% वर आले आहे. १९ एप्रिलला संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचे प्रमाऩ २६.१९% होते.
ग्रामीण भागात शेतीच्या काढणी हंगामाची कामे सुरू झाली. बाजारात शेतमालाची खरेदी सुरू झाली आणि रोजगाराची टक्केवारी वाढत चालली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमिक (CMIE) या संस्थेने सातत्याने केलेल्या पाहणीत वरील आकडेवारी समोर आली.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याच्या कालावधीत १५ मार्च दरम्यान बेरोजगारीचा आकडा ६.७४% होता. त्यानंतर १९ एप्रिल पर्यंत प्रत्येक आठवड्यात बेरोजगारीचा आलेख वाढतच होता. तो ५ एप्रिलला ३०.९४% पर्यंत पोहोचला होता. मात्र त्यानंतर आलेख खाली येण्यास सुरवात झाली.
अर्थात २० – २१% वर येऊन ठेपलेला बेरोजगारीचा आकडाही समाधानकरक नाही. पण ग्रामीण भागात हाताला काम मिळणे सुरू झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था आणखी खुलायला सुरवात झाली तर रोजगाराची टक्केवारी वाढू शकते. त्याच बरोबर एका बाबीकडे लक्ष ठेवले पाहिजे, की शहरांमधून ग्रामीण भागाकडे मजूर आणि कामगारांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा मजूर आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाकडे वळला तर वेगळ्या प्रकारच्या समस्येला तोंड फुटू शकते. शहरी भागात मजूर – कामगारांची टंचाई निर्माण होईल आणि ग्रामीण भागात मजूर – कामगारांची गर्दी झाल्याने तेथे कदाचित पुरेसे काम उपलब्ध होणार नाही. अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून सरकारने मजूर – कामगारांच्या स्थलांतराचे नियोजन करावे, अशी सूचना CMIE ने केली आहे.