वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना मृतांच्या आकडेवारीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला घेरण्याचा राज्यसभेत प्रयत्न केला. त्याला बाकीच्या विरोधी पक्षांच्या खासदारांनी उचलून धरले. परंतु, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी या मुद्द्यावर जेव्हा चोख उत्तर दिले तेव्हा संजय राऊत राज्यसभेत हजर राहिलेले दिसले नाहीत.We haven’t told anyone to show less numbers (of deaths) or less positive cases.
कोरोनासंदर्भातील चर्चेत राज्यसभेत आज विविध २१ पक्षांच्या २६ खासदारांनी भाग घेतला. त्यामध्ये संजय राऊत हे एक होते. त्यांनी केंद्र सरकारला कोरोनाग्रस्त मृतांची आकडेवारी का लपविता असा सवाल केला होता.
या विषयावर जोरदार भाषण करून संजय राऊत सदनातून निघून गेलेले दिसले. त्यानंतर डॉ. विनय सहस्त्रबुध्दे बोलले त्यांनी संजय राऊत, मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवारांचे सूचक उल्लेख केले. पण तेव्हा संजय राऊत हे सदनात नव्हते.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी कोरोनावरील चर्चेला उत्तर दिले. ते म्हणाले, की केंद्र सरकारने कोरोना मृतांचे आकडे लपविण्याचा प्रश्नच येत नाही. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसमवेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक विडिओ कॉन्फरन्समध्ये कोरोनाग्रस्तांचे आणि कोरोना मृतांचे आकडे लपवू नका असेच सांगितले आहे. राज्यांनी जी आकडेवारी दिली ती एकत्र करून केंद्र सरकार प्रसिध्द करीत आहे.
यापेक्षा केंद्र सरकारने त्या आकडेवारीत कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. असे असताना केंद्र सरकारने कोरोना मृतांचे आकडे लपविण्याचा प्रश्नच कुठे येतो. ज्यांनी आकडे लपविले असतील, त्यांचे त्यांनाच माहिती आहे, असा टोला मांडविया यांनी संजय राऊतांचे नाव न घेता लगावला.
- टाळी, थाळीने डॉक्टरांचे मनोधैर्य वाढल्याचे माझ्या डॉक्टर मुलीने सांगितले
टाळ्या – थाळ्यांचा उल्लेख करताना मनसुख मांडविया थोडे भावनिक झालेले दिसले. ते म्हणाले, मी देशाचा आरोग्यमंत्री असण्याआधी एक पिता आहे. माझी मुलगी शिकाऊ डॉक्टर आहे. ती कोविड वॉर्डात काम करते.
जेव्हा पंतप्रधानांनी कोविड योध्द्यांसाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करायला सांगितली, तेव्हा तिने या सगळ्या गोष्टींमुळे डॉक्टरांना कशी स्फुर्ती मिळाली हे मला सांगितले.
प्रत्यक्ष कोविड वॉर्डात काम करणाऱ्या डॉक्टर आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य आपल्या केवळ टाळी आणि थाळी वादनाने उंचावत असेल तर ते करायला काय हरकत होती, असा सवालही मनसुख मांडविया यांनी उपस्थित केला.