वृत्तसंस्था
टोकियो : भारताचा ऑलिंपियन पहिलवान रवी दहिया याने टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये 57 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले. याविषयी त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला, की सर्व देशवासीयांच्या प्रार्थना फळाला आल्या आणि माझ्या मेहनतीला यश मिळाले. देशासाठी मी रौप्य पदक मिळवू शकलो. मी आनंदी जरूर आहे, पण संपूर्ण समाधानी नाही. कारण सुवर्ण पदक मिळवण्याचे माझे ध्येय होते. ते मी पूर्ण करू शकलो नाही. यापुढे मी अधिक चांगली मेहनत करेन आणि पुढच्या ऑलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न करेन, असा आत्मविश्वास रवी दहिया याने व्यक्त केला. thank people of the country for praying for me& my coaches and federation for supporting me.
रवी लहान वयात मेहनत करून ऑलिंपिकमध्ये पोहोचला आहे. त्याच्या हातात वय आहे. त्यामुळे तो अधिक मेहनत करून पुढच्या ऑलिंपिकमध्ये नक्की सुवर्णपदक मिळेल, असा विश्वास त्याच्या वडिलांनी देखील व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवी दहिया याला खास फोन करून त्याचे अभिनंदन केले. भारताला तुझा अभिमान वाटतो. भावी पिढ्यांच्या खेळाडूंसाठी तू प्रेरणास्थान बनला आहेस, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवीचे अभिनंदन केले. हार जीत होत असते परंतु आपल्या सर्व ऑलिम्पियन खेळाडूंनी जिगरबाज मेहनत केली देशाचे नाव जागतिक पटलावर रोशन केले, अशा भावना देखील पंतप्रधानांनी रवीशी बोलताना व्यक्त केल्या.
15 ऑगस्ट रोजी सर्व ऑलिम्पिक पदक विजेते आणि ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू यांना देशाच्या 75व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी निमंत्रित केले आहे. त्याची आठवण देखील मोदी यांनी त्याला करून दिली. पंतप्रधानांच्या हस्ते या विजयी खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.