वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून अवघ्या महाराष्ट्राला आणि तामिळनाडूला प्रतिक्षा असणाऱ्या बैलगाडा शर्यत आणि तामिळनाडूतील जल्लीकट्टू खेळांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला असून या खेळांना कायद्याच्या चौकटीत राहून परवानगी दिली आहे. डिसेंबर 2022 मध्येच या संदर्भातली सुनावणी पूर्ण झाली होती. तेव्हा सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. Supreme Court Upholds Laws Allowing Jallikattu, Kambala & Bull-Cart Racing In Tamil Nadu, Karnataka & Maharashtra.
अखेर आज या संदर्भातला निकाल न्यायालयाने दिला असून त्यानुसार महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांना परवानगी दिली आहे. अशा खेळांमध्ये प्राण्यांचे हाल होत असल्याचा दावा करणाऱ्या याचिका प्राणीमित्र संघटनांनी केल्या होत्या. त्यावर अखेर न्यायालयाने निकाल दिला आहे.
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत, तामिळनाडूमध्ये जलीकट्टू आणि कर्नाटकमध्ये कम्बाला या खेळांसाठी संबंधित तिन्ही राज्य सरकारांनी त्या त्या राज्यांसाठी वन्यजीव संरक्षण कायद्यात काही सुधारणा केल्या होत्या. त्यानुसार त्या त्या राज्यांनी या खेळांना मान्यताही दिली होती. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयांना सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. या संदर्भात सविस्तर सुनावणी घेऊन डिसेंबरमध्ये हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. अखेर आज त्यासंदर्भातला निकाल आला आहे.
राज्य सरकारांनी पारित केलेल्या कायद्यांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयानेच २०१४मध्ये जल्लीकट्टू आणि त्यासारख्या खेळांवर बंदी घालण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर राज्य सरकारांनी या कायद्यातच सुधारणा करून नवीन विधेयक मंजूर केलं होतं.
काय म्हटलं न्यायालयाने?
न्यायालयाने यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्याचा राज्य सरकारांचा अधिकार यावेळी मान्य केला. तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू गेल्या शतकाहून अधिक काळापासून चालू आहे. हा खेळ तामिळनाडूच्या संस्कृतीचा भाग आहे की नाही हे ठरवण्याचे काम न्यायालयाचे नाही. जर विधिमंडळाने असे ठरवले असेल की जल्लीकट्टू तामिळनाडूच्या संस्कृतीचा भाग आहे, तर न्यायव्यवस्था त्याहून वेगळी भूमिका घेऊ शकत नाही. यासंदर्भात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार विधिमंडळाला आहे. हीच बाब महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांनाही लागू होते, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
राजकीय नेत्यांकडून आभार
सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निकाल आहे. गावांत देशी खिलार जातीचा बैल प्रामुख्याने शर्यतीत पळवला जातो. मधल्या काळात शर्यत बंद असल्यामुळे हजारो बैल कत्तलखान्याकडे गेले. शेळीची किंमत जास्त होती, पण बैलाच्या खोंडाची किंमत कमी झाली होती. मी सुप्रीम कोर्टाचे या निर्णयासाठी आभार व्यक्त करतो, असे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अनेक वर्षं बैलगाडा मालकांनी हा लढा दिला आहे. हे सर्वांचे यश आहे. मी सरकारचेही मनापासून आभार मानतो. महाविकास आघाडीचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी हिरीरीने पुढाकार घेऊन हा खटला उभा राहण्यासाठी प्रयत्न केले. पहिल्या टप्प्यात अटी-शर्तींसह परवानगी दिली होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
Supreme Court Upholds Laws Allowing Jallikattu, Kambala & Bull-Cart Racing In Tamil Nadu, Karnataka & Maharashtra.
महत्वाच्या बातम्या
- अखेर कर्नाटकचं नाटक संपलं! सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर शिवकुमार यांची ‘या’ पदावर बोळवण
- द फोकस एक्सप्लेनर : कसा होतो हिंडेनबर्गचा रिपोर्ट, अमाप कमाई करणारे कोण आहेत नॅथन अँडरसन? वाचा सविस्तर
- राज्यात 15 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, पैकी दहा जिल्हे एकट्या विदर्भातील
- CBI Summons : समीर वानखेडेला CBI कडून चौकशीसाठी समन्स, आर्यन खानशी संबंधित प्रकरण