वृत्तसंस्था
नवी दिल्ली – मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंगांना सुप्रिम कोर्टाने आज फटकारले. तुम्ही जिथे ३० वर्षे सेवा केली, नोकरी बजावली त्या मुंबई – महाराष्ट्र पोलीसांवर तुमचा विश्वास कसा नाही…??, असा खडा सवाल सुप्रिम कोर्टाने उपस्थित केला. Supreme Court refuses to entertain former Mumbai Police Commissioner Param Bir Singh’s plea seeking transfer of all inquiries
मुंबई पोलीसांनी आपल्या विरोधात केलेल्या सर्व आरोपांची चौकशी महाराष्ट्राबाहेर नेऊन करावी, अशी याचिका परमवीर सिंग यांनी सुप्रिम कोर्टात केली होती. ती स्वीकारायला देखील सुप्रिम कोर्टाने नकार दिला.
त्याचवेळी सुप्रिम कोर्टाने परमवीर सिंगांना कडक शब्दांत फटकारले. ज्या पोलीस दलात तुम्ही ३० वर्षे सेवा बजावलीत, त्या महाराष्ट्र केडरचे तुम्ही एक महत्त्वाचे भाग आहात आणि आता तुम्ही म्हणताय पोलीसांच्या चौकशीवर विश्वास नाही. हे धक्कादायक आहे, असे निरीक्षण सुप्रिम कोर्टाने नोंदविले.
अँटिलिया स्फोटके, सचिन वाझे – मनसुख हिरेन प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय खळबळ माजली. यात ठाकरे – पवार सरकारने परमवीर सिंगांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली. त्यांच्या विरोधात ठाण्यातल्या प्रकरणात चौकशी लावली आहे. या चौकशीविरोधात परमवीर सिंग यांनी सुप्रिम कोर्टाचे दार ठोठावले आणि ही चौकशी महाराष्ट्राबाहेर न्यावी, अशी मागणी केली होती. ती सुप्रिम कोर्टाने फेटाळून लावली.