वृत्तसंस्था
नवी दिल्ली – देशात कोविडची तिसरी लाट जरी आली तरी तिला तोंड देण्यास देशात सज्जता आहे. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने सार्वत्रिक लसीकरणाची वास्तववादी योजना तयार केली आहे, असा निर्वाळा विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव आशूतोष शर्मा यांनी दिला आहे. Our vaccination plan of inoculating people by end of Dec is ambitious but also realistic: Dr Ashutosh Sharma, Secretary, Dept of Science & Technology
सप्टेंबर – ऑक्टोबर २०२१ दरम्यान कोरोनाची तिसरी लाट भारतात येण्याचा इशारा वैद्यकीय तज्ञ देत आहेत. ही लाट यशस्वीरित्या रोखण्यासाठी सार्वत्रिक लसीकरणाचा सल्लाही त्यांनी दिला आहे. त्यावर केंद्र सरकारचे सर्व स्तरांवर काम सुरू आहे, असे सांगून आशूतोष शर्मा म्हणाले की, देशात सर्वांना लस मिळण्याची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वांचे लसीकरण झाले पाहिजे ही योजना महत्त्वाकांक्षी जरूर आहे. पण ती वास्तवात आणण्याची आमची तयारी आहे.
श्री चित्र तिरूनाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने नवी आरटी पीसीआर चाचणीची पध्दती विकसित केली आहे. त्यातून कोविडचे अनेक म्यूटंट समजतात. त्यामुळे चाचणी चुकण्याची शक्यताही कमी होते. त्यामुळे कोविड पेशंट ओळखून त्यांच्यावर योग्य उपचार शक्य होतील, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.
या आधी जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाच्या विभागीय संचालिका डॉ. पुनम खेत्रपाल सिंग यांनी भारताला कोविडच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. सध्या भारतात कोविड केसेसची संख्या स्थिरावली आहे. काही ठिकाणी कमी होते आहे. पण देशात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती दोन्ही वाढविली पाहिजे. कारण पुढची लाट नेमकी किती तीव्र असेल आणि कधी येईल, हे सांगता येणे कठीण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.