वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेश ची निवडणूक अजून सात – आठ महिने लांब असताना सर्व भाजप विरोधकांनी भाजपवर वेगवेगळे राहून प्रखर हल्ले चढवत तद्दन जातिवाद अवलंबला आहे. मायावती म्हणाल्या, “आम्ही ब्राह्मणांचे संरक्षण करू”, तर असदुद्दीन ओवैसी म्हणालेत, “उत्तर प्रदेशात मुसलमान जिंकतील”.Opposition brought Uttar Pradesh elections on racism; Mayawati said, “Let’s protect Brahmins”; Owaisi says “Muslims will win Uttar Pradesh”
हे दोन्ही नेते वेगवेगळ्या ठिकाणी भाजपविरोधी मेळाव्यांमध्ये बोलत होते. मायावती यांनी उत्तर प्रदेशात ब्राह्मण मेळावे घेण्याचा सपाटा लावला आहे. अशाच ब्राह्मण मेळाव्यात बोलताना मायावती म्हणाल्या, की उत्तर प्रदेशातील ब्राह्मणांना भाजपच्या राजवटीपेक्षा बहुजन समाज पक्षाचा राजवटीत सुरक्षितता लाभली होती.
भाजपने ब्राह्मण समाजाला टार्गेट केले आहे. बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ब्राह्मण समाजापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त ब्राह्मणांना बहुजन समाज पक्षाची जोडले पाहिजे. 2007 मध्ये बहुजन समाज पक्षाला बहुमत मिळाले होते. त्यावेळी पक्षाने ब्राह्मण समाजाचा सन्मानच केला होता
. यावेळी बहुमत मिळाल्यानंतर ब्राह्मण समाजाच्या संरक्षणासाठी बहुजन समाज पक्ष विशेष प्रयत्न करेल. बहुजन समाज पक्ष आता नुसती स्मारके बांधून थांबणार नाही, तर उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी काम करेल, असा टोला मायावती यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनाही लगावला.
ब्राह्मण समाजाच्या मतांसाठी अखिलेश यादव आहेत उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भगवान परशुरामांचे पुतळे उभारत आहेत. त्याची उद्घाटने करत आहेत. समाजवादी पक्ष जास्तीत जास्त ब्राह्मण उमेदवारांना तिकीट देणार आहे हे त्यांनी जाहीर केले आहे. याच स्मारकांच्या मुद्द्यावरून मायावतींनी अखिलेश यादव यांना टोचले आहे.
9 ऑक्टोबरला काशीराम जयंतीनिमित्त त्या मोठी घोषणाही करणार आहेत. हैदराबादच्या एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी फैजाबाद, कानपूर या शहरांच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत जिंकण्यासाठीच आम्ही मैदानात आलो आहोत. इतर पक्षांनी मुसलमानांचा वोट बँक म्हणून वापर केला. पण राज्यात आम्ही जिंकण्यासाठीच उमेदवार उभे करणार आहोत. हे मुसलमान जिंकतील, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
मायावती आणि असदुद्दीन ओवेसी यांची भाषणे जास्तीत जास्त जातींना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याच विकासाच्या मुद्द्यांना स्पर्श करणारी होती. मायावतींनी ब्राह्मणांना आणि ओवैसी यांनी मुसलमानांना आपल्या बाजूने खेचण्याचे भरपूर प्रयत्न चालवले आहेत. या दोन्ही नेत्यांनी भाजप विरोधात तोफा डागताना हिंदुत्वाला नावे ठेवली आहेत, पण स्वतः मात्र तद्दन जातीवादाचाच आधार घेतला आहे.