• Download App
    नव्या संसदेत सेंगोल, चाणक्य आणि अखंड भारताचा नकाशा; "कबुतरी शांती"ला फाटा देत गरुड झेपेची आशा!! New parliament shows India's changing posture from pigeon to hawkish

    नव्या संसदेत सेंगोल, चाणक्य आणि अखंड भारताचा नकाशा; “कबुतरी शांती”ला फाटा देत गरुड झेपेची आशा!!

    भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात 28 मे 2023 सावरकर जयंती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसदेचे उद्घाटन करताना जे स्पष्ट संकेत दिलेत, ते उघडून डोळे नीट बघण्याची गरज आहे. भारताने खऱ्या अर्थाने कूस बदलली आहे. भारत गुलामीतून मुक्त झाला. तुम्हीही गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर या, हे पंतप्रधान गेल्या 9 वर्षांत अनेकदा बोलले आहेत. याचेच ठळक प्रत्यंतर त्यांनी नव्या संसदेत दिले आहे. New parliament shows India’s changing posture from pigeon to hawkish

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी संसद बांधताना प्रत्यक्ष कृतीतून “काही बदल” घडवून दाखविले आहेत. लोकसभेच्या सभापतींच्या आसनाशेजारी भारतीय परंपरेतील राजदंड सेंगोलची प्रतिष्ठापना तर त्यांनी केली आहेच, पण त्या पलीकडे जाऊन भारत आता “कबुतरी शांतीचा” देश उरला नाही, तर गरुड झेप घेणारा हा नवीन भारत आहे, हे त्यांनी संसदेच्या दरवाजात गरुडध्वजाची प्रतिमा उभी करून दर्शवून दिले आहे.

     

    शांतीची जुनी प्रतीके

    नव्या संसदेच्या बांधकामात आणि रचनेत वापरलेली प्रत्येक प्रतीके नीट विचार करून निवडली आहेत. भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर “कबुतरी शांतीचा” मार्ग अवलंबून आपण केवळ गौतम बुद्धाचे उपासक आहोत, असे दर्शविणारी प्रतीके राष्ट्रपती भवन आणि जुन्या संसदेत प्रस्थापित केली होती. त्यामुळेच राष्ट्रपती भवनातल्या एका भव्य हॉलचे नावच मुळी अशोक हॉल आहे आणि तेथे तथागत भगवान गौतम बुद्धांची संगमरवरी प्रतिमा उभी आहे. राष्ट्रपती भवनातील ही प्रतिमा आजही जशीच्या तशी आहे. ती हलविलेली नाही. तसे करण्याचे काही कारणही नाही.

    संसदेतील प्रतिमा बदल

    पण नवीन संसद भवनात मात्र जाणीवपूर्वक मोदी सरकारने नव्या भारताची दिशा ठळकपणे सूचित करणाऱ्या काही प्रतिमा निवडल्या आहेत. संसदेच्या गॅलरीत अखंड भारत आणि या भारताचे चरण धुणारा महासागर ही भव्य प्रतिमा साकारली आहेच, पण त्याचबरोबर शेंडीची गाठ सोडलेले आर्य चाणक्यही संसदेच्या गॅलरीत दिसत आहेत आणि हेच भारताच्या खऱ्या अर्थाने प्रतिमा बदलाचे वैशिष्ट्य आहे.

    आर्य चाणक्य

    अखंड भारताचे ध्येय आणि आर्य चाणक्यांनी शेंडीची सोडलेली गाठ या प्रतिमा साध्या नाहीत. त्या भारताचे भविष्यकालीन ध्येय दर्शविणाऱ्या आहेत आणि त्या आता अधिकृतरित्या भारतीय संसदेत विराजमान झाल्या आहेत. हे या संसदेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे.

    अखंड भारत हेच ध्येय

    संसदेतील गॅलरीमध्ये बाकी ऋषीमुनींचे दर्शन, योगामधील मुद्रा वगैरे भारतीय परंपरांचा ठसा उमटवला आहेच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताचे जे भागध्येय, “अखंड भारत”, त्याची प्रतिमा मोदी सरकारने संसदेत ठळक लावली आहे. एरवी अशी प्रतिमा मोदी ज्या संस्कारांच्या मुशीतून येतात, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये अनेकदा दिसते. पण आता अखंड भारताची ही प्रतिमा भारतीय संसदेत प्रत्येक संसद सदस्याला आपल्या मूळ ध्येयाची आठवण करून देणारी ठरणार आहे. त्याच बरोबर शेंडीची गाठ सोडलेले आर्य चाणक्य त्यांच्या दृढनिश्चयाची प्रतिमा प्रत्येकाच्या मनात ठसविल्याखेरीज राहणार नाहीत… आणि हीच “कबुतरी शांती”पासून दूर जाऊन गरुड झेपे घेणाऱ्या नव्या भारताच्या ओळखीची दमदार पावले आहेत.

    New parliament shows India’s changing posture from pigeon to hawkish

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही