विशेष प्रतिनिधी
भोपाळ : बारा वर्षाखालील मुलांच्या पालकांना लसीकरणात प्राधान्य देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असल्याचे गृहित धरुन सरकार नियोजन करत आहे. लसीकरणामुळे पालक सुरक्षित राहतील आणि मुलांची देखभाल करण्यास सक्षम असतील, असे सरकारचे म्हणणे आहे. MP govt. took decision for children vaccine
राज्यात आतापर्यंत ७,८२,९४५ जणांना बाधा झाली तर ८२९७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, दुर्दैवाने मुलांना कोरोनाची लागण झाल्यास पालकांना त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. अशावेळी पालकांचे लसीकरण झाल्याने ते संसर्गमुक्त राहू शकतील आणि पाल्याकडे लक्ष देऊ शकतील.
सध्या मध्य प्रदेशात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. परंतु १२ वर्षाचे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे अपत्य असणाऱ्या पालकांना लस कशी मिळेल आणि त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागेल, याबाबत सरकारने स्पष्ट केलेले नाही. एवढेच नाही तर परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.