विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट मध्ये जिहादी दहशतवाद्यांनी जळीत कांडात आठ लोकांची हत्या केल्यानंतर हा मुद्दा पश्चिम बंगाल विधानसभेतही तापला. भाजपच्या आमदारांनी रामपुरहाट हिंसाचारावर चर्चेची मागणी विधानसभेत लावून धरली. त्यावर सभागृहात जोरदार वादावादी झाली. वातावरण आणखी तापले. वादावादी विकोपाला जाऊन तिचे भांडणात रूपांतर झाले आणि भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले. ही मारामारी एवढी वाढली की आमदारांनी एकमेकांचे कपडे फाडले. पण त्यानंतर बंगाल विधानसभेत जो प्रकार घडला तो महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या पॅटर्नचे अनुकरणच ठरला…!!Mahavikas Aghadi pattern of MLA suspension in West Bengal !!
महाराष्ट्रात जसे भाजपच्या 12 आमदारांना अध्यक्षांनी निलंबित केले होते, तसेच भाजपच्या पाच आमदारांना पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी निलंबित केले आहे.
महाराष्ट्र विधानसभेत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांना त्यांच्या कथित गैरवर्तणूकी बद्दल वर्षभरासाठी निलंबित केले होते. या आमदारांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आपले निलंबन रद्द करून घेतले. सुप्रीम कोर्टाने कोणत्याही आमदाराला संपूर्ण वर्षभरासाठी निलंबित करता येऊ शकत नाही असा निर्णय देत महाविकास आघाडीला फटकार लगावली होती.
मात्र यातून धडा न घेता पश्चिम बंगाल विधानसभेने तृणमूल काँग्रेसच्या पाशवी बहुमताच्या बळावर भाजपच्या 5 आमदारांना निलंबित केले आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांचा देखील समावेश आहे.
– महाराष्ट्राची नव्हे, महाविकास आघाडीची “प्रेरणा”
महाराष्ट्र आणि बंगाल एकमेकांपासून प्रेरणा घेतात असे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणतच असतात. मात्र आमदार निलंबनाची “प्रेरणा” महाराष्ट्राची नसून महाविकास आघाडीची दिसते आहे. पश्चिम बंगाल मध्ये महाविकास आघाडीच्या “प्रेरणेने” 5 आमदार निलंबित केल्याची घटना दिसून येत आहे.
– तृणमूल आमदारांची दादागिरी, तुंबळ हाणामारी!!
कोलकाता : पश्चिम बंगालच्या बीरभूममधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सोमवारी विधानसभेत जोरदार रणकंदन झाले. यावेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी दादागिरी केल्यानंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदार सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन कपडे फाडण्यापर्यंत मजल गेली. या घटनेनंतर भाजपच्या 5 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे.
बीरभूम हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी
पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बीरभूम हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केल्यावर तृणमूल काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले यानंतर भाजप आणि तृणमूल आमदारांमध्ये भांडण झाले. मारामाऱ्या झाल्या इतकेच नव्हे तर आमदारांनी भांडणामध्ये एकमेकांचे कपडेही फाडले. गदारोळानंतर भाजप आमदारांनी सभात्याग केला. या हाणामारीत तृणमूल आमदार आमदार असित मजुमदार यांच्या नाकाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मजुमदार यांना एसएसकेएममध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. या घटनेनंतर भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले असून यामध्ये शुभेंदू अधिकारी, मनोज तिग्गा, शंकर घोष, दीपक बर्मन आणि नरहरी महतो यांचा समावेश आहे. भाजप आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण करण्यात आली.
धक्काबुक्की करत फाडले त्यांचे कपडे
बीरभूम हिंसाचार प्रकरणी भाजपने सभागृहात चर्चेची मागणी केली आणि त्यानंतर विरोध सुरू झाला. यानंतर सभागृहातील परिस्थिती बिघडली आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. यानंतर भाजप आमदारांनीही विधानसभेबाहेर निदर्शने केली. सभागृहात निषेधादरम्यान सुरक्षा रक्षकांनी आपल्यावर हल्ला केला आणि ढकलले, असा आरोप भाजप आमदारांनी केला आहे. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी सांगितले की, भाजप आमदारांना धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांचे कपडे फाडण्यात आले.