विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रक्तपात करून कुठल्याही प्रश्नावर तोडगा काढता येत नसल्यामुळे भारत हा रशिया-युक्रेन संघर्षांच्या ठामपणे विरोधात असल्याचे भर देऊन सांगतानाच; भारताने कुणाची बाजू घेतली असेलच तर ती शांततेची आणि हिंसाचार तत्काळ संपवण्याची घेतली आहे, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे.India strongly advocates peace in Russia-Ukraine conflict, says Foreign Minister S. Jayashankar
युक्रेनमधील परिस्थितीबाबत लोकसभेतील चर्चेत उत्तर देताना जयशंकर बोलत होते. ते म्हणाले, युक्रेन व रशियाच्या अध्यक्ष पातळीवरील चर्चेसह या दोन देशांमध्ये चचेर्ची भारत भलामण करतो. या प्रकरणी भारताची काही मदत होऊ शकत असेल, तर त्यासाठी योगदान देण्यात आम्हाला आनंद होईल.
मात्र,युक्रेनमधील परिस्थितीच्या संदर्भात भारताने घेतलेल्या भूमिकेला राजकीय रंग देणे हे अनाहूत व अनुचित असल्याचे मत जयशंकर यांनी व्यक्त केले. या मुद्दय़ावर भारताचा दृष्टिकोन त्याची राष्ट्रीय मूल्ये, देशहित व राष्ट्रीय धोरण यांच्या आधारे असावीत हे सर्व सदस्य मान्य करतील.
युक्रेनच्या बुचा शहरात नागरिकांच्या हत्या करण्यात आल्याच्या मुद्दय़ावर बोलताना जयशंकर म्हणाले, या वृत्तांमुळे भारत अत्यंत अस्वस्थ असल्याचे जयशंकर म्हणाले. तेथे झालेल्या हत्यांचा तीव्र निषेध करतो. हे अतिशय गंभीर प्रकरण असून, त्याच्या स्वतंत्र तपासाच्या मागणीला पाठिंबा देतो, असे त्यांनी सांगितले.