वृत्तसंस्था
रायदिघी – पश्चिम बंगालच्या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ममतादीदींवर प्रखर राजकीय हल्ला चढविल्यावर दीदींनीही त्यांना प्रत्युत्तर दिले असून भाजपने हैदराबादला आणि फुरफुरा शरीफला पैसे देऊन निवडणूकीच्या मैदानात उतरविल्याचा आरोप केला. Hyderabad (Asaduddin Owaisi) & Furfura Sharif (Abbas Siddiqui) have been given money by BJP to divide Hindus & Muslims, says mamata banerjee
रायदिघीत जाहीर सभेला संबोधित करताना त्या म्हणाल्या, की भाजपवाल्यांनी पश्चिम बंगालमध्ये हिंदू – मुसलमानांमध्ये फूट पाडण्यासाठी हैदराबादला म्हणजे असदुद्दीन ओवैसी आणि फुरफुरा शरीफ म्हणजे अब्बास सिद्दीकी यांना पैसे देऊन मैदानात उतरविले आहे. हे दोन्ही भाजपच्या इशाऱ्यावर काम करून मतांमध्ये फूट पाडण्यासाठी आले आहेत. तुम्हाला सीएए आणि एनआरसी नको असेल, तर त्यांना मतदान करू नका. ते उपयोगाचे ठरणार नाही. त्यांना मतदान करणे म्हणजे भाजपलाच मतदान केल्यासारखे आहे, असा आरोप ममतांनी केला.
बंगालमध्ये हिंदू – मुसलमान एकत्र चहा पितात. एकत्र येऊन दुर्गापूजा, सरस्वतीपूजा साजरी करतात. येथे येऊन भाजपवाले दोन्ही समाजांमध्ये फूट पाडत आहेत, असा आरोपही ममतांनी केला.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुगळीच्या सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या पराभवाची लक्षणे त्यांनी सांगितली, तर सोनापूरच्या सभेत त्यांना वाराणसीत येण्याचे खोचक निमंत्रण देऊन टाकले.
मोदी म्हणाले, दीदी…, तुमचेच लोक म्हणाताहेत, की तुम्ही पुढची लोकसभा निवडणूक वाराणसीतून लढणार आहात. हरकत नाही… पण दीदी, याचा अर्थ तुम्ही बंगालमध्ये आपला पराभव होणार असल्याचे स्वीकारलेले दिसतेय. आणि आमच्याच सरकारने हल्दिया – वाराणसी जो जलमार्ग विकसित केलाय त्यातून तर प्रेरणा घेऊन तुम्ही वाराणसीत यायचे म्हणता आहात का… दीदी, आपण जरूर वाराणसीत या… माझ्या वारणीसच्या लोकांचे, यूपीच्या लोकांचे मन एवढे मोठे आहे, की ते तुम्हाला टुरिस्ट म्हणणार नाहीत… टुरिस्ट गँग देखील म्हणणार नाहीत. दीदी, तुम्ही जरूर वारणसीत या.