वृत्तसंस्था
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेतली, तर बंगाल भाजपमध्ये कोणी राहणार नाही, असा दावा भाजप सोडून पुन्हा तृणमूळ काँग्रेसमध्ये घरवापसी केलेले नेते मुकूल रॉय यांनी केला आहे. have joined TMC today. In the present circumstances, no one will stay in Bharatiya Janata Party: Mukul Roy on joining TMC
मुकूल रॉय यांचा तृणमूळ काँग्रेसमध्ये सन्मान केला जाईल आणि त्यांना महत्त्वाची भूमिका दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले. तृणमूळ सोडून मुकूल रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यावर आणि त्यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अनेकदा वैयक्तिक टीका केली होती. तरीही ते तृणमूळ काँग्रेसमध्ये कसे काय परत आले, असे विचारले असता, मुकूल रॉय म्हणाले, की आता मी तृणमूळ काँग्रेसमध्ये परत आलो आहे. बंगालची सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजपमध्ये कोणी राहील असे वाटत नाही.
तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकूल रॉय आणि त्यांचे चिरंजीव शुभ्रांशू रॉय यांनी तृणमूळ काँग्रेसमध्ये पुनःप्रवेश केला. त्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
मुकूल रॉय हे भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यांच्या पत्नी कोरोनाने आजारी होत्या त्यावेळी दररोज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या त्यांची चौकशी करण्यासाठी फोन करीत होत्या, हा आमच्यासाठी खूप दिलासा होता, असे विधान मुकूल रॉय यांच्या चिरंजीवांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. त्याचवेळी मुकूल रॉय हे तृणमूळ काँग्रेसमध्ये परतणार असल्याच्या बातम्या तेजीत आल्या होत्या.
मुकूल रॉय हे एकेकाळी ममता बॅनर्जींच्या निकटवर्ती नेत्यांमधले एक नेते मानले जात होते. २०१८ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपचे काम केले होते. भाजपला बंगालमध्ये १८ लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळविता आला होता.
मात्र, विधानसभा निवडणूकीच्या वेळी भाजपने सुवेंदू अधिकारींना महत्त्व दिले आणि मुकूल रॉय हळूहळू मागे पडले. आता तर सुवेंदू अधिकारींना भाजपने विधानसभेतले विरोधी पक्षनेते पद देखील दिले आहे. त्यामुळे भाजपमध्ये सुवेंदू अधिकारींचे राजकीय महत्त्व आपल्यापेक्षा वाढल्याची मोठी खंत मुकूल रॉय यांना असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.