वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारने 1 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या सूर्यनमस्कार मोहिमेस मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने विरोध दर्शवला आहे. राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वानुसार अशाप्रकारे देशातल्या बहुसंख्याक समाजाची संस्कृती अल्पसंख्यांक समाजावर लादणे अयोग्य असल्याचे पत्रक मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने काढले आहे. लॉ बोर्डाचे महासचिव मौलाना खालिद सैफुल्ला रहमानी यांच्या नावाने हे पत्रक काढण्यात आले आहे. Amrit Mahotsav of Independence: Muslim Personal Law Board opposes Suryanamaskar; Appeal to Muslim students not to participate
इस्लाममध्ये सुर्याला देवता मानण्यात आलेले नाही. सूर्यनमस्काराचे आयोजन ही एक प्रकारे सूर्यपूजाच आहे. त्यामुळे इस्लाम त्याला मान्यता देत नाही. मुस्लिम समाजातील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सूर्यनमस्कार मोहिमेत सहभागी होण्याची गरज नाही. देशात धर्मनिरपेक्ष राज्य घटना लागू आहे. अशावेळी सरकारने एकाच धर्माला पुढाकार देणारे आयोजन करणे गैर आहे.
सरकारने धर्मनिरपेक्ष मूल्य मानूनच देश चालवायला पाहिजे. सूर्यनमस्कार घालून देशप्रेम सिद्ध होत नाही. सरकारला देशप्रेमाचे धडे द्यायचे असतील तर त्यासाठी फार तर राष्ट्रगीत शिकवावे, बेरोजगारीकडे लक्ष द्यावे, सरकारी मालमत्ता विक्रीची योजना बंद करावी, अशा सूचना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने केले आहेत.