विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे.यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदी सरकार धडाधड निर्णय घेत आहे.मोदींनी कालच लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला 3 हजार कोटी रुपये आणि भारत बायोटेकला दीड हजार कोटी रुपयांचा कर्जाऊ निधी दिला आहे.
याचबरोबर केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना 1 मेपासून कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या धोरणातील या निर्णायक बदलाचे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आभार मानले आहेत. ADAR POONAWALA SAYS THANK YOU MODIJI
देशात लशीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आम्हाला लस उत्पादन वाढवण्यासाठी 3 हजार कोटी रुपये द्या, अशी मागणी अदर पूनावालांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
त्यांनी म्हटले होते की, आम्हाला 3 हजार कोटींचा निधी मिळाल्यास लशीचे उत्पादन तीन महिन्यांत वाढू शकेल. याबाबत आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने निर्णय न घेतल्यास आम्ही बँकांकडे कर्जासाठी जाऊ.
आता केंद्र सरकारने पूनावालांची मागणी मान्य केली आहे. देशातील लस उत्पादनाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने सिरमला 3 हजार कोटी रुपये आणि भारत बायोटेकला 1 हजार 500 कोटी रुपयांचा कर्जाऊ निधी दिला आहे. याबद्दलच्या प्रस्तावाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज तत्वत: मंजुरी दिली. आता संबंधित मंत्रालयाच्या माध्यमातून दोन्ही कंपन्यांकडे हा निधी पोचणार आहे. लवकरात लवकर हा निधी कंपन्यांना पोचेल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
याबद्दल बोलताना अदर पूनावाला म्हणाले की, देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याचा निर्णय आणि लस उत्पादक कंपन्यांना निधी देणे याचा फायदा लस उत्पादन आणि वितरणाला होणार आहे. सरकारच्या धोरणातील हा निर्णायक बदल स्वागतार्ह आहे. लस उद्योगाच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानतो.
ADAR POONAWALA SAYS THANK YOU MODIJI