वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवसाच्या पहिल्याच तासात आक्रमक बॅटिंगला सुरूवात केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल केल्यानंतरचे संसदेचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने नवीन मंत्र्यांची ओळख करून देण्यासाठी मोदी उठले तेव्हा विरोधकांनी फोन टॅपिंग, इंधन दरवाढ या विषयावर गदारोळ करण्यास सुरूवात केली.Women, tribals, dalits became Union Ministers, but some do not seem to like it; Modi’s first intense attack on the opposition
तेव्हा मोदींनी सुरूवातीला काही मिनिटे हा गदारोळ सहन केला. पण नंतर मात्र, ते आक्रमक झाले. ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला, आदिवासी, दलित समूदायातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. ते आपापल्या क्षेत्रात कर्तृत्ववान व्यक्ती आहेत.
पण त्यांची ओळख करून देण्याच्या कामातच विरोधक अडथळा आणत आहेत. बरोबर आहे, महिला, दलित आणि आदिवासी लोकांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळाली आहे, हे काही लोकांना आवडलेले दिसत नाही. म्हणून ते या नव्या मंत्र्यांची ओळख देखील ऐकून घ्यायला तयार नाहीत, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला.
परंतु, तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच एक गमतीशीर वक्तव्य करून संसदेत हलके फुलके वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, की देशातले ४० कोटी कोरोनाविरुध्दच्या लढाईत आता बाहुबली बनलेत.
कारण कोरोनाची लस बाहूमध्ये म्हणजे दंडावर देण्यात येते. बाहूमध्ये लस घेऊन ४० कोटी लोक बाहुबली बनलेत, असे विधान त्यांनी केले. कोरोनाने सगळे जग वेढले आहे. भारताने त्याविरोधात प्रभावी उपाययोजना केली आहे. त्यामुळे संसदेत या विषयावर अर्थपूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोरोनावरच्या चर्चेला सरकार प्राधान्य देईल. सर्व खासदारांचे सरकार ऐकून घेईल. ज्या उणिवा राहिल्या असतील, त्या सुधारून पुढे जाण्याची सरकारची इच्छा आहे. संसदेतल्या पक्षनेत्यांनी आज सायंकाळी जरूर वेळ काढावा. मी त्यांना सगळी माहिती सांगेन. त्याची चर्चा देखील संसदेच्या दोन्ही सदनात करण्याची सरकारची तयारी आहे, असे मोदी म्हणाले.