चीन मध्ये जाऊन राजनाथ सिंहांनी चीन आणि पाकिस्तान यांना धुतले; शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनचे (SCO) संयुक्त घोषणापत्र सही न करता धुडकावून लावले.
त्याचे झाले असे :
शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक चीन मधल्या छिङ्दाव शहरात झाली. त्या बैठकीला सुरुवातीपासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्या बैठकीला हजर राहिले. या बैठकीत केलेल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना पुरते expose केले. दहशतवादाच्या मुद्द्यावर दुतोंडी भूमिका घेणे चालणार नाही. दहशतवादाचा उगम जिथून होतो, तिथेच घाव घालावा लागेल ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने दहशतवादाच्या उगमापाशीच घाव घातला. इथून पुढे देखील दहशतवादाच्या उगमावर घाव घालायला भारत मागे पुढे पाहणार नाही. दहशतवादाला प्रोत्साहन देणारे देश आणि दहशतवादी यांच्यात फरक करणार नाही. दोघांनाही सारखेच ठोकून काढू, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट बजावले. पहलगाम मधल्या हल्ल्याचा त्यांनी भाषणामध्ये ठळक उल्लेख केला.
तरी देखील चीन आणि पाकिस्तान यांनी शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) संयुक्त घोषणा पत्रात चालबाजी करून घोळ घातला. त्यांनी संबंधित संयुक्त पत्रकात बलुचिस्तान मधल्या स्वातंत्र्य चळवळीचा दहशतवादी घटना म्हणून उल्लेख केला. त्याबद्दल भारताचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे भारतावर टपका ठेवला, पण पहलगाम मधल्या हल्ल्याचा निषेध केला नाही. भारताने दहशतवादाविरुद्ध घेतलेली कठोर भूमिका उचलून धरली नाही.
चीन आणि पाकिस्तान यांची ही चालबाजी लक्षात येताच राजनाथ सिंह यांनी इथल्या तिथे कठोर भूमिका घेतली. त्यांनी SCO च्या संयुक्त घोषणा पत्रावर सही करायला नकार दिला. पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चीनने घोषणा पत्रात बलुचिस्तानचा उल्लेख केला, पण पहलगामचा उल्लेख टाळला, याचा निषेध राजनाथ सिंह यांनी ठामपणे नोंदविला.
त्यामुळे घडले असे की, राजनाथ सिंह यांचे कठोर भाषण शांघाय ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या रेकॉर्डवर तर राहिलेच, पण त्यांनी संयुक्त घोषणा पत्रावर सही नाकारल्याची बातमीही चर्चेत आली. संयुक्त घोषणा पत्रामध्ये नेमक्या काय घोषणा आहेत?, या विषयापेक्षा राजनाथ सिंह यांनी त्यावर सही करायला नकार दिला, या बातमीची चर्चा जास्त रंगली.
राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांना वगळून बाकी सर्व सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. यामध्ये चीन, रशिया, इराण, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजकिस्तान, उजबेकिस्तान आणि बेलारूस या देशांच्या संरक्षण मंत्र्यांचा समावेश होता. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संयुक्त घोषणा पत्रावर स्वाक्षरी करायला नकार देऊन आणि पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची भेट टाळून राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तान यांना धडा शिकविला.
जुल्फीकार अली भुट्टो यांचे अकांडतांडव
पण हे करताना राजनाथ सिंह यांनी जुल्फीकार अली भुट्टो यांच्यासारखे अकांडतांडव मात्र केले नाही. 1965 मध्ये भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्रसंघात बरेच अकांडतांडव केले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत पाकिस्तान विरुद्ध ठराव येता कामा नये, यासाठी त्यांनी सुरुवातीला प्रयत्न केले होते, पण भारताने ते प्रयत्न हाणून पाडले. सुरक्षा समितीने भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षावर तिथे ठराव आणला होता. त्या ठरावावर मतदान होण्यापूर्वी जुल्फीकार अली भुट्टो यांनी तिथे मोठे अकांडतांडव केले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचा ठराव एकतर्फी आहे. तो पाकिस्तान वर अन्याय करणार आहे. भारतानेच पाकिस्तानवर आक्रमण केले. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले नाही, असा दावा करणारे भाषण त्यांनी आक्रस्ताळी भाषेत केले होते. त्यानंतर मतदान होणार होते. पण मतदानात आपला पराभव होईल हे लक्षात येताच जुल्फीकार अली भुट्टो यांनी त्या बैठकीतच सगळी कागदपत्रे भिरकावली. तिथून पाय आपटत ते बाहेर पडले होते. तरीदेखील सुरक्षा समितीने पाकिस्तानाविरुद्धचा ठराव मंजूर करायचा तो केलाच होता.
राजनाथ सिंह यांनी मात्र सर्व आंतरराष्ट्रीय संकेत पाळून भारताची ठाम भूमिका मांडली. संयुक्त घोषणा पत्रावर सही करायला नकार देऊन चीन आणि पाकिस्तान यांची चालबाजी उघड्यावर आणली. हे सगळे त्यांनी चीनमध्ये जाऊन केले.
when rajnath singh refuses to sign sco document that skipped pahalgam india objection
महत्वाच्या बातम्या
- नागपूरकरांची स्वप्नपूर्ती; आर्थिक दुर्बल घटकांना 480 घरे वाटप; महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याच्या दिशेने मार्गक्रमण
- World War III : तिसऱ्या महायुद्धाच्या धोक्याची घंटा वाजली! आता चीन अन् रशिया कोणते मोठे पाऊल उचलणार?
- IndiGo flight : ‘मेडे’ कॉलनंतर चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग
- RCB wins : RCBने ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीतून BCCIने घेतला धडा!