वृत्तसंस्था
कोलकाता : सध्याच्या स्थितीत कोरोनाच्या फैलावाला अटकाव करण्यास पहिले प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे बंगालच्या विधानसभा निवडणूकीतील ४ टप्प्यांमधील मतदान वगळून सर्व मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान घेण्यात यावे, अशी मागणी तृणमूळ काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.TMC’s position is clear, we want remaining elections to be held in one phase, I request BJP to make their position clear, says TMC leader Derek O’Brien
निवडणूक आयोगाने आज कोलकात्याच्या सर्किट हाऊसमध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्याला तृणमूळ काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्यासह त्यांचे सहकारी, तसेच भाजपच्या वतीने सरचिटणीस भूपेंद्र यादव, स्वप्न दासगुप्ता आदी उपस्थित होते.
प्रत्येक पक्षाने निवडणूक आयोगासमोर आपापली भूमिका मांडली. त्यात तृणमूळ काँग्रेसने मतदानाचे उर्वरित ४ टप्पे रद्द करून एकाच टप्प्यात सर्व मतदारसंघांमध्ये मतदान घेण्याची मागणी केली. तिला बाकीच्या पक्षांनी पाठिंबा दिलेला नाही.
मतदानाच्या टप्प्यांचा निर्णय निवडणूक आयोगाकडे
भाजपने मतदानाच्या टप्प्यांचा निर्णय निवडणूक आयोगावर सोपविला. कोरोना प्रोटोकॉल पाळून प्रचार करण्याचे आश्वासन दिले. तसेच बंगालमध्ये लोकशाहीला सुसंगत असे निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावेत, असे सूचित केले.
निवडणूकीत झालेल्या हिंसाचाराकडेही निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले. सर्व राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी कोणते नियम पाळावेत, हे निवडणूक आयोगाने जाहीर करावे, ते भाजपचे नेते पाळतील, असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले.
काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि फुर्फुरा शरीफ आपली भूमिका नंतर निवडणूक आयोगाला कळवतील, असे सांगण्यात आले.