विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : स्वतःला पंतप्रधान पदाचे दावेदार समजणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगण विधानसभेसाठी मात्र “सेफ गेम” खेळला आहे. त्यांनी 2 जागांवरून स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. So called prime ministerial candidate k Chandra shekhar rao announced his candidature from 2 assembly seats
चंद्रशेखर राव यांनी आज तेलंगण विधानसभेच्या 119 जागांपैकी 115 जागांचे भारत राष्ट्र समितीचे उमेदवार जाहीर केले. त्याचवेळी त्यांनी स्वतःची 2 जागांवरून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर चंद्रशेखर राव यांच्या “सेफ गेमची” चर्चा सुरू झाली.
चंद्रशेखर राव यांनी केंद्रातल्या मोदी सरकार विरोधात आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण तो फारसा यशस्वी ठरला नाही. त्या उलट त्यांना वगळून काँग्रेसने पुढाकार घेत “इंडिया” आघाडीची स्थापना केली. त्या आघाडीमध्ये चंद्रशेखर राव आधीच भेटून गेलेल्या उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी, नीतीश कुमार, अरविंद केजरीवाल या नेत्यांचा काँग्रेसने “इंडिया” आघाडीत समावेश केला. पण चंद्रशेखर राव यांना त्या आघाडीतून बाहेर ठेवले. चंद्रशेखर राव यांची पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा लपून राहिली नाही. वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांनी चंद्रशेखर राव यांना भेट जरूर दिली. पण त्यांच्या पंतप्रधान पदाच्या महत्त्वाकांक्षा पाहून त्यांच्यापासून चार हात अंतर राखले.
या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव यांनी आज ज्या पद्धतीने एकदम 115 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि त्यामध्ये स्वतःची विधानसभेच्या दोन जागांवरून उमेदवारी जाहीर केली. यावरून त्यांनी विधानसभेसाठी “सेफ गेम” केल्याचे बोलले जात आहे. जे स्वतःला पंतप्रधान पदाचे उमेदवार समजतात ते पराभवाच्या भीतीने विधानसभेच्या दोन जागांवरून उमेदवारी जाहीर करतात, यातून त्यांचा आत्मविश्वास घटल्याचे दिसत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
पण त्याच वेळी 115 जागांच्या उमेदवारी 119 पैकी 115 जागांची उमेदवारी जाहीर करून आपला आत्मविश्वास जाहीर केल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
या उमेदवारी यादीत तीन मुस्लिम उमेदवार आहेत. ही उमेदवारी यादी बदलणार नाही. 16 ऑक्टोबरला भारत राष्ट्र समितीचा जाहीरनामा प्रसिद्ध करू. जे बंडखोरी करतील त्यांना पक्षातून बाहेर काढू, असे चंद्रशेखर राव यांनी आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर करून टाकले. पण आजच्या यादीतून एकीकडे चंद्रशेखर राव यांच्या पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा आणि दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी दोन ठिकाणाहून अर्ज दाखल उमेदवारी जाहीर करून खेळलेली “सेफ गेम” या राजकीय विसंगतीची चर्चा जास्त रंगली.