वृत्तसंस्था
कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारशी पंगा कायम ठेवताना आज दुहेरी चाल खेळली. आज सकाळी त्यांनी केंद्र सरकारला मुख्य सचिव अल्पन बॅनर्जी यांना केंद्राच्या सेवेत पाठविणार नसल्याचे पत्र लिहिले आणि सायंकाळी त्यांच्या रिटायरमेंटची घोषणा करून त्यांना ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या विशेष सल्लागारपदी नेमून टाकले. Since Alapan Banerjee has retired today on May 31 from his service, he is not going to join in Delhi: West Bengal CM Mamata Banerjee
त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवपदी एच. के. व्दिवेदी यांची तर गृह सचिवपदी बी. पी. गोपालिका यांची नियुक्ती ममता बॅनर्जींनी जाहीर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ममतांनी राजकीय संघर्ष आता प्रोटोकॉल तोडण्यापासून ते केंद्र सरकारच्या कोणत्याही सूचना न पाळण्यापर्यंत ताणला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्धातास बैठकीसाठी तिष्ठत ठेवले. शिवाय आल्यावर त्यांच्या हाती एक निवेदन सोपवून त्या निघून गेल्या. या सगळ्या “नियोजनात” त्यांना राज्याचे मुख्य सचिव अल्पन बॅनर्जी यांनी साथ दिली. केंद्र सरकारने अल्पन यांची ताबडतोब बदली करून त्यांना नवीन दिल्लीत हजर होण्याचे आदेश दिले. पण खुद्द अल्पन यांनी आणि ममता बॅनर्जी यांनी ते मान्य केले नाहीत. उलट केंद्र सरकारला त्यांनी पत्र लिहून राज्यातल्या जनतेवर अन्याय करीत असल्याचा आरोप केला.
पण पंतप्रधान मोदी आणि ममता यांच्या या “राजकीय युध्दात” अल्पन बॅनर्जी यांच्या सरकारी सेवेचा अडथळा येतोय हे लक्षात आल्यानंतर ममतांनी त्यांना सरकारी सेवेतून रिटायर करून टाकले आणि लगेच पुढच्या ३ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सल्लागारपदी नेमून टाकले. यातून त्यांनी अल्पन बॅनर्जींवरची संभाव्य शिस्तभंग कारवाई टाळण्याचा प्रयत्नही केला आहे.