विशेष प्रतिनिधी
मुंबई : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्कवर महारॅलीतून होणार आहे. त्या महा रॅलीत INDI आघाडीतले सगळे नेते हजर राहणार आहेत, पण शिवाजी पार्कच्या रॅली आधीच सावरकर नावाचा गजर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या कानी कपाळी ओरडून होऊ लागला आहे. Savarkar issue dominates before INDI alliance rally in Mumbai
राहुल गांधी + उद्धव ठाकरे + शरद पवार + अखिलेश यादव + तेजस्वी यादव + एम. के. स्टालिन यांची महारॅली शिवाजी पार्कवर सायंकाळी होणार आहे. तत्पूर्वी राहुल गांधींनी मणीभवन येथे जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतींना वंदन केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातला. वेगवेगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालत राहुल गांधी फिरले. नेहमीप्रमाणे मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले, पण त्यांच्या रॅली दरम्यान बाळासाहेबांचे शिवाजी पार्कवरचे स्मारक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक इथे मात्र राहुल गांधी गेले नाहीत. त्यामुळे भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंना डिवचायची संधी मिळाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवक्त्या चित्रा वाघ या भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना ट्विट करून डिवचले, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरांनी देखील उद्धव ठाकरेंवरच प्रश्नचिन्ह लावले.
ज्या शिवाजी पार्कवर वीर सावरकरांच्या ओजस्वी वाणीतून हिंदुत्वाचा हुंकार उठला, त्याच शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस आणि हिंदूंसाठी शिवसेना नावाची जय संघटना स्थापन केली. त्या शिवाजी पार्कवर आज उद्धव ठाकरे राहुल गांधीपुढे शरणागती पत्करणार का??, असा बोचरा सवाल बावनकुळे यांनी केला, तर हेच का तुमचे सावरकर प्रेम??, असा सवाल करून चित्रा वाघ यांनी राहुल गांधी बाकीच्या महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालत फिरले, पण स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाणे टाळले याकडे लक्ष वेधून उद्धव ठाकरेंना डिवचले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी देखील ट्विट करून उद्धव ठाकरेंवरच शरसंधान साधले. शिवाजी पार्क वरून या 5 गोष्टी आज ऐकू येणार नाहीत, असे म्हणत त्यांनी त्या 5 गोष्टींची यादीच दिली. यात त्यांनी शिवसेनेची सगळी वैशिष्ट्ये 5 गोष्टींमध्ये सांगून टाकली. बाळासाहेब ठाकरे नेहमी भाषणाची सुरुवात करताना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो अशी करत असत, तशी सुरुवात आज होणार नाही. सावरकर वीर होते आहेत आणि राहतील हे आज ऐकू येणार नाही. समान नागरी कायदा करायला आणि 370 कलम काढून टाकायला आमचा पाठिंबा आहे, असे कोणी सांगणार नाही, अशा शब्दांमध्ये मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले.
त्यामुळे राहुल गांधी आज शिवाजी पार्कवरच्या भाषणामध्ये सावरकरांविषयी काय बोलणार?? आणि ते काही बोललेच, तर उद्धव ठाकरे राहुल गांधींनी त्याच स्टेजवरून काय उत्तर देणार??, याची सगळ्या राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.
Savarkar issue dominates before INDI alliance rally in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- DRPPL : धारावी पुनर्विकास सर्वेक्षण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी राहुल गांधींची धारावीत जाऊन अदानींविरुद्ध चिथावणी!!
- भारताने UN मध्ये ‘इस्लामफोबिया’च्या ठरावावर मतदानापासून राखले अंतर
- आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशामध्ये १९ एप्रिलपासून विधानसभा निवडणुका
- निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…