वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्षानुवर्षे देशातल्या आरक्षणाचा कट्टर समर्थकच राहिलेला आहे. दलितांच्या गौरवशाली योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय इतिहास देखील अपूर्णच आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आज नवी दिल्लीत केले.Rashtriya Swayamsevak Sangh is a staunch supporter of reservation; Indian history is incomplete without mentioning the glorious contribution of Dalits; Statement by Govt. Dattatreya Hosballe
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काही वर्षांपूर्वी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय स्वरूपाचा वाद निर्माण झाला होता. डॉ. भागवत यांच्या वक्तव्याचा बिहारच्या 2015 च्या निवडणुकीत भाजपला फटका बसल्याचे त्या वेळी बोलले गेले होते.
मात्र सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी देशातल्या आरक्षणासंदर्भात संघाची सविस्तर भूमिका आज मांडली. ते म्हणाले, की आरक्षण ही भारतासाठी ऐतिहासिक गरज आहे. जोपर्यंत समाजाच्या एका महत्त्वाच्या घटकाला आपल्या आपल्यावर अन्याय होतो आहे असे वाटते तोपर्यंत आरक्षण टिकून राहिले पाहिजे. किंबहूना तो अन्याय दूर करण्यासाठी आरक्षण ठेवले पाहिजे. संघाने आरक्षणाचे वर्षानुवर्ष समर्थनच केले आहे. वंचित, दुर्लक्षित समाजावर झालेला अन्याय धुऊन काढण्यासाठी आरक्षणाची गरज आहे.
भारतातील इतिहास लेखनाच्या संदर्भात देखील दत्तात्रेय होसबळे यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की देशाच्या इतिहासात देखील दलित समाजाचे प्रचंड मोठे योगदान आहे. दलित समाजाच्या योगदानाचा गौरवशाली उल्लेख केल्याशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण, अप्रामाणिक आणि असत्य राहतो याकडे दत्तात्रेय होसबळे यांनी लक्ष वेधले.
याचा अर्थ देशाचा प्रामाणिक इतिहास लिहिण्यासाठी दलित, वंचित समाजाच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केलाच पाहिजे. म्हणजेच देशाचा इतिहास परिपूर्ण आणि सत्य असा होईल, असे ते म्हणाले. दत्तात्रेय होसबळे यांच्या आजच्या वक्तव्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आरक्षणासंदर्भातील भूमिका तसेच दलित समाजाच्या ऐतिहासिक योगदानाविषयीची भूमिका अधिक ठळकपणे समोर आली आहे आणि स्पष्ट झाली आहे.