विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दोन मतदारसंघांतून भरघोस मतांनी विजयी झालेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रायबरेली मतदारसंघाचे खासदार म्हणून कायम राहणार हे जवळपास निश्चित आहे. पक्षसूत्रानुसार याबाबतचा निर्णय ते अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोडतील.Rahul Gandhi will leave Wayanad where he supported, will stay in Rae Bareli, Kharge will take final decision
त्यातच केरळ काँग्रेसच्या नेत्यांनी वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पक्षाच्या दृष्टीने राहुल यांची गरज सध्या उत्तर भारतात जास्त आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण वायनाडच्या जनतेला त्यांनी जागा सोडल्याचे वाईट वाटणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. पक्षाने प्रियंका गांधी-वढेरा यांनी वाराणसीतून निवडणूक लढवावी, अशी तयारी केली होती. परंतु प्रियंका यांनी त्यास नकार दिला होता. वाराणसीचे उमेदवार झाल्यास रायबरेली व अमेठीत प्रचारासाठी पुरेसा वेळ देता येणार नाही, अशी सबब त्यांनी सांगितली होती.
मग वायनाडचे काय होणार?
वायनाडसाठी पक्षात माजी मुख्यमंत्री के. करुणाकरणचे पुत्र मुरलीधरन यांना उमेदवारी देण्यावर विचार केला जात आहे. पक्षाने सुरेश गोपी यांना टक्कर देण्यासाठी मुरलीधरन यांना त्रिसुरला पाठवले होते. वायनाडमधून एखाद्या अल्पसंख्याक उमेदवाराला पोटनिवडणुकीत उतरवले जावे, असेही मत पक्षातील एका गटाने व्यक्त केले आहे.
यूपीत काँग्रेस मजबूत करण्यावर भर
रायबरेलीत राहुल यांना कायम ठेवणे उत्तर प्रदेशात काँग्रेसला नव्याने बळकट करण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. राहुल यांनी ही जागा सोडल्यास प्रियंका यांना तेथून उतरवणे गरजेचे होईल. गांधी परिवार लोकसभेत राहुल व प्रियंका यांना सोबत उतरवण्याच्या मुळीच बाजूने नाही. कारण भाजपला घराणेशाहीचा आरोप करण्याची संधी मिळेल, असे त्यांना वाटते.