विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांचा अपमान करून शिवसेना उबाठा अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पूर्ती राजकीय गोची करून ठेवली आहे. कारण राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, अरविंद सावंत हे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार, शिंदे गटातच फूट पडणार, भाजपमध्येच अस्वस्थता आहे, अशी चर्चेची पेरणी करत होते.Rahul Gandhi insulted Veer Savarkar embarrasses Shivsena Uddhav Thackeray
पण राहुल गांधींनी अकोल्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आणि त्याआधी वाशिमच्या जाहीर सभेत सावरकरांच्या माफीनाम्याचा उल्लेख करून त्यांचा अपमान केला आणि शिवसेना उबाठाची पुरती राजकीय पंचाईत झाली. डॅमेज कंट्रोल करताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या नाकीनऊ आल्याचे दिसले आणि मध्यावधी निवडणुकांची चर्चा घडविणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते ठाकरे पक्षाचे नेते महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा इशारा देते झाले. हा इशारा दस्तूर खुद्द संजय राऊत यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे.
ज्या महाविकास आघाडीच्या बळावर महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले होते, त्यामध्ये काँग्रेसला सत्तेची मंत्रिपदे मिळाली होती, ती महाविकास आघाडी फुटण्याचा इशारा देण्याची वेळ संजय राऊतांवर आली यातच महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणाचे सार सामावले आहे.
सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा उचलून शिवसेना उबाठा महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यावर काँग्रेसलाच मोठा फटका बसेल, असा सुप्त इशारा संजय राऊत यांनी दिला खरा, पण हा इशारा देऊन काही तास उलटल्यानंतर देखील काँग्रेस नेत्यांनी या इशाऱ्याकडे लक्ष दिलेले दिसले नाही. उलट ते राहुल गांधींच्या आजच्या शेगावच्या सभेच्या तयारीकडेच लक्ष देताना दिसत आहेत.
राहुलजींच्या सभेची चर्चा वेगळ्या दिशेला
राहुल गांधींची शेगावची सभा देखील सुरुवातीला सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे येणार अशा चर्चेत रंगली होती. पण सावरकरांच्या अपमानानंतर या सभेत कोण येणार? या चर्चेपेक्षा मनसे राहुल गांधींची सभा उधळणार ही चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुद्धा काँग्रेससाठी मोठे डॅमेजिंगच ठरली आहे. कारण शेगावच्या सभेत शरद पवार उद्धव ठाकरे आले असते, तर ती सभा म्हणजे महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन ठरले असते. आता शेगावची सभा यशस्वी झाली तरी मनसेला सभा उधळत आली नाही म्हणून ती यशस्वी झाली, असा शिक्का तिच्यावर बसणार आहे किंवा मनसेचे नेते वेडात मराठे वीर दौडले सातच्या स्टाईलवर राहुल गांधींची सभा उधळण्यात यशस्वी झाले तरी देखील त्या सभेची चर्चा मनसेने उधळलेली सभा अशी होईल. एकूण सावरकरांच्या अपमानापूर्वी आणि अपमानानंतर महाराष्ट्राचे राजकारण बदलत्या वळणावर आले आहे हे मात्र निश्चित!!
Rahul Gandhi insulted Veer Savarkar embarrasses Shivsena Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या