भारतीय आर्थिक सुधारणा धोरणाचे प्रवर्तक आणि कार्यवाहक डॉ. मनमोहन सिंग वयाच्या 92 व्या वर्षी कालवश झाले. भारतीय अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था आणणारे अर्थमंत्री म्हणून ते कायम लक्षात राहिले, पण ते 10 वर्षे भारताचे पंतप्रधान होते. पण त्यांची पंतप्रधान पदाची कारकीर्द ही कायम सोनिया गांधींच्या राजकीय छायेखालची राहिली होती.
पण मूळात सोनिया गांधींनी मनमोहन सिंग यांच्यासारख्या नेत्याला पंतप्रधान तरी का केले होते??, या विषयीचा थोडा वास्तववादी आढावा घेतला, तर वेगळेच “राजकीय सत्य” समोर येते.
सोनिया गांधींनी पंतप्रधान पदाची शपथ घेणे शक्य नाही, हे त्यावेळच्या राजकीय परिस्थितीतून आणि त्यावेळचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या राजकीय भूमिकेतून स्पष्ट झाल्यानंतर सोनिया गांधींना आपल्याशिवाय दुसरी व्यक्ती पंतप्रधान करण्याची पर्याय उरला नव्हता. अर्थात त्यावेळी सोनिया गांधींपुढे केवळ मनमोहन सिंग यांच्याच नावाचा पर्याय नव्हता, तर अनेक नावे उपलब्ध होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये अनेक कर्तृत्ववान राजकीय नेते होते. यामध्ये प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, वीरप्पा मोईली, शिवराज पाटील, सुशील कुमार शिंदे यांची नावे चर्चेत होती. दोन मराठी नावे पंतप्रधान पदाच्या चर्चेत असणे हे महाराष्ट्रासाठी त्यावेळी भूषणावह होते.
पण सोनिया गांधींनी या सगळ्यांची नावे वगळून मनमोहन सिंग यांचे नाव पंतप्रधान पदासाठी निवडले. यामध्ये मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव आणि आदर तर होताच, पण त्याचबरोबर अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीची दखल घेण्याचाही तो प्रकार होता… पण ते अर्धसत्य होते!!
त्या पलीकडे जाऊन मनमोहन सिंग यांच्या निवडी मागचे “राजकीय सत्य” वेगळेच होते. ते म्हणजे, मनमोहन सिंग हे निष्णात अर्थतज्ञ आणि कसलेले प्रशासक जरी होते, तरी ते मूळात “राजकीय नेते” नव्हते. राजकारणाचा त्यांना फारसा अनुभव नव्हता. किंबहुना राजकारणापासून अलिप्त राहणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पिंड होता. केंद्रात नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्रीपद स्वीकारताना देखील मनमोहन सिंग यांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले होते. नरसिंह राव यांनी त्यांना पूर्णपणे राजकीय संरक्षण दिले होते म्हणूनच ते अर्थमंत्री म्हणून यशस्वी झाले होते. अशा मनमोहन सिंग यांना सोनिया गांधींनी पंतप्रधानपदी निवडले, याचा अर्थ त्यांच्यापासून असणारा “राजकीय धोका” सोनियांनी आपल्या निर्णयातून टाळला होता!!
सोनियांच्या गाठीशी भारतीय राजकारणाचा त्यावेळी विशिष्ट अनुभव जमा झाला होता. नरसिंह राव यांना पंतप्रधानपदासाठी दिलेला पाठिंबा याचा “राजकीय अनुभव” सोनिया गांधींनी घेऊन झाला होता. सोनिया गांधींच्या 10 जनपथ या निवासस्थानी एकदा ताटकळत थांबावे लागल्यानंतर नरसिंह राव कधीही सोनिया गांधींना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेले नव्हते. ते “त्रयस्थ” ठिकाणी सोनिया गांधींना भेटत असत. त्यामुळे एखादी राजकारणी व्यक्ती पंतप्रधान पदासाठी सर्वोच्च पदावर बसल्यावर आपल्याला कशी “पॉलिटिकली डॉमिनेट” करू शकते, याचा अनुभव सोनिया गांधींनी घेऊन झाला होता.
प्रणव मुखर्जी हा त्यावेळी खरं म्हणजे सर्वांत चांगला राजकीय चॉईस होता. पण मुखर्जी हे नरसिंह रावांचे मित्र होते, हे सोनिया गांधी विसरल्या नव्हत्या. प्रणव मुखर्जी आणि राजीव गांधी यांचे राजकीय षडाष्टक त्यांनी जवळून पाहिले होते. प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान केले, तर ते “नरसिंह राव मार्गे” जातील याची सोनिया गांधींना ज्यावेळी खात्री झाली, त्यावेळी त्यांनी प्रणवदांचा चॉईस ड्रॉप केला. भरपूर विचारांती त्यांनी कुठलाच “राजकीय नेता” पंतप्रधान पदावर नको, याचा निर्णय घेतला आणि त्यानंतरच मनमोहन सिंग यांच्यासारख्या अर्थतज्ञ आणि प्रशासकाचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा केला, ही यातली अधोरेखित वस्तूस्थिती होती.
मनमोहन सिंग यांच्या निवडीचा सोनिया गांधींचा तो राजकीय आडाखा बरोबर ठरला. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधींना कधी “पॉलिटिकली डॉमिनेट” केले नाही. सोनिया गांधींच्या छत्रछायेखालचे कर्तृत्ववान पंतप्रधान ही त्यांची ओळख कायम राहिली. भले मनमोहन सिंग यांची त्यावेळी माध्यमांनी “एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर” किंवा “अंडर अचीव्हर” अशी हे टाळणी केली असेल, पण मनमोहन सिंग हे कर्तृत्ववान अर्थशास्त्री होते आणि भारतीय आर्थिक सुधारणा धोरणाचे कार्यवाहक होते हे मात्र विसरता येणार नाही!!
Political truth behind Dr. Manmohan Singh’s prime ministership
महत्वाच्या बातम्या
- Governor : माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला मणिपूरचे, तर जनरल व्ही. के. सिंह मिझोरामचे राज्यपाल!!
- छगन भुजबळ ते अभयसिंहराजे भोसले; राष्ट्रवादीतल्या खच्चीकरणाचे किस्से, त्यांच्याच नेत्यांनी चव्हाट्यावर आणले!!
- Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोईने आता अमेरिकेत निर्माण केली दहशत!
- Delhi elections : दिल्ली निवडणुकीपूर्वी बांगलादेशी घुसखोरांचे दणादण बनवले जात होते मतदार कार्ड