नाशिक : तेलंगण विधानसभा निवडणूक जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तेलंगण दौरे वाढले आणि काल निजामाबाद मध्ये घेतलेल्या भव्य जाहीर सभेत मोदींनी तेलंगण मधली काही “राजकीय रहस्येच” बाहेर काढली. PM Modi kept KCR out of NDA, closed way to power for Congress in telangana
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या भारत राष्ट्र समिती सकट राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीए मध्ये येऊ इच्छित होते, पण मीच त्यांचा प्रवेश रोखला. कारण तेलंगणाच्या जनतेने हैदराबाद मध्ये जो भाजपला कौल दिला, त्याच्याशी भाजपला द्रोह करायचा नव्हता, असे मोदींनी स्पष्टच सांगून टाकले.
हैदराबाद मधल्या भाजपच्या विजयाने केसीआर हादरले आणि त्यांना भाजप शिवाय पर्याय उरला नाही, असे दिसल्याने ते दिल्लीत आपल्याकडे आले होते. भरजरी शाल घालून त्यांनी माझा सन्मान केला आणि भारत राष्ट्र समितीला राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये प्रवेश देण्याची विनंती केली. पण हैदराबाद महापालिका निवडणुकीत जनतेने भाजपला तब्बल 48 जागांवर विजय मिळवून दिला होता. केसीआर यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून हैदराबादच्या जनतेने भाजपच्या पारड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश घातले होते. भाजपच्या मदतीशिवाय केसीआर यांना हैदराबाद मध्ये सत्ता स्थापन करता येणार नव्हती. त्यामुळेच ते आपल्याकडे दिल्लीला आले आणि भाजपचा पाठिंबा मागितला, पण मी तो त्यांना दिला नाही आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीत देखील त्यांचा प्रवेश होऊ दिला नाही. कारण प्रसंगी भाजप विरोधात बसणे पसंत करेल, पण तुमच्यासारख्या महाराजाला सत्तेसाठी मदत करणार नाही असे आपण केसीआर यांना स्पष्ट बजावल्याचे “रहस्य” पंतप्रधान मोदींनी निजामाबाद मध्ये उलगडून सांगितले.
कुठलेही राजकीय रहस्य सहज उलगडून सांगणे हा मोदींचा स्वभाव नाही, पण तरी देखील त्यांनी सांगितलेल्या रहस्याचा नेमका अर्धाच भाग उलगडला गेला आहे.
मोदींनी के. चंद्रशेखर राव यांचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश नाकारून नेमके काय साध्य केले??, तर तेलंगणामध्ये काँग्रेसचा सत्ता प्रवेश रोखून टाकला.
आता तेलंगण विधानसभेत काँग्रेस विरुद्ध केसीआर यांच्यात राजकीय साठमारी होईल आणि त्यात भाजप पुढे सरकण्याची शक्यता आहे. तशीही तेलंगणात भाजपची एवढी ताकद नाही, की काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती यांना एकाच वेळी अंगावर घेऊन त्यांच्याशी भाजप टक्कर देऊ शकेल. त्यामुळे तेलंगण राष्ट्र समितीला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत घेऊन भाजपला तिथे दुय्यम भूमिकाच स्वीकारावी लागले असती आणि काँग्रेसला मात्र तिथे संघटनात्मक बळाच्या जोरावर मोकळे रान मिळाले असते.
राजकीय शत्रू म्हणून तेलंगण राष्ट्र समिती आणि भाजप यांना एकत्रितरित्या टार्गेट करता येणे काँग्रेसला सोपे ठरले असते, पण तेलंगण राष्ट्र समितीचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश नाकारून मोदींनी नेमकी इथेच राजकीय पाचर मारून ठेवली आहे. आता तेलंगणात काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती एकत्र येऊ शकणार नाहीत. त्यांना आपापसात झुंजावेच लागेल. त्यामुळे त्यांना दोघांची शक्ती एकमेकांविरोधातच वापरावी लागेल आणि त्यात शक्तीने कमी असलेला भाजप थोडाफार तरी पुढे सरकण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचा बूस्टर डोस रोखला
या खेळीतून एक प्रकारे मोदींनी आपल्या मुख्य विरोधकाला म्हणजे काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी छोटा विरोधक केसीआर यांना “राजकीय बफर” म्हणून काँग्रेस विरोधात उभे ठाकविले आहे. केसीआर यांचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश रोखून मोदींनी काँग्रेसच्या हातून दक्षिणेतले एक राज्य परस्पर काढून घेतले आहे!!… अन्यथा कर्नाटक मधल्या विजयानंतर तेलंगणात काँग्रेसला विजय मिळणे, हा त्या पक्षासाठी लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फार मोठा राजकीय बूस्टर डोस ठरला असता. तो डोस तेलंगणातून मिळण्याची शक्यता मोदींनी धूसर करून टाकली आहे.
PM Modi kept KCR out of NDA, closed way to power for Congress in telangana
महत्वाच्या बातम्या
- भारताचा खरा इतिहास लिहिण्याची वेळ आली आहे, अंधार दूर होताच विरोधक ओरड करतात, सरकार्यवाह होसबळे यांचे प्रतिपादन
- एनआयए-सीबीआयने म्हटले- मणिपूरमधील प्रत्येक अटक पुराव्यावर आधारित; स्थानिक आदिवासी फ्रंटने एजन्सींवर पक्षपाताचा केला आरोप
- WHOने जगातील दुसरी मलेरियाविरोधी लस वापरण्यास दिली मान्यता – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
- PM मोदी 2 दिवसांत दुसऱ्यांदा तेलंगणा-छत्तीसगडला भेट देणार; दोन्ही राज्यांत 31,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी