विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सत्ताधारी NDA आणि विरोधी INDI या दोन्ही आघाड्यांनी ताणले त्यामुळे लोकसभा अध्यक्ष पदाच्या मुद्द्यावर तुटले!!, असेच आज घडले. दोन्ही आघाड्यांनी सुरुवातीला तोंडी तडजोडीची भूमिका घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी तीन वेळा बातचीत केली. परंतु, लोकसभेच्या उपाध्यक्ष पदाच्या मुद्द्यावर विरोधी आघाडी आग्रही राहिली. मात्र, सत्ताधारी NDA आघाडीने त्यावर कोणतेही आश्वासन दिले नाही. लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होऊ द्या त्यानंतर उपाध्यक्ष पदाबाबत बघता येईल, असे उत्तर सत्ताधारी NDA आघाडीने दिले. अर्थातच इथे खरी ठिणगी पडली. Opposition lost first battle in loksabha speaker elections
तसेही आकड्यांनी बळकट झालेल्या INDI आघाडीने सरकारशी कोणत्या स्थितीत तडजोड करायची नाही हे ठरविले होतेच. परंतु, लोकसभा अध्यक्ष पदाबाबत आपण तडजोड करू शकतो, असे सुरुवातीला त्यांनी दाखविले. सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा देखील केली. मात्र राहुल गांधींनी संसदेच्या दारामध्ये उभे राहून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच तोफा डागल्या. मोदी बोलतात एक आणि करतात दुसरेच. त्यांना विरोधकांचे सकारात्मक सहकार्य नकोच आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधींच्या आरोपांना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी दुजोरा दिला.
त्यानंतर त्या ठिणगीची वात पेटली. पियुष गोयल यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले. आधी उपाध्यक्ष ठरवा मग अध्यक्ष ठरवू असले राजकारण आम्ही मान्य करणार नाही, असे पियुष गोयल म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी मल्लिकार्जुन खर्गेंचा अपमान केला, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यावर मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी आपण तीन वेळा बोललो, असे उत्तर राजनाथ सिंह यांनी दिले.
पण दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही आघाड्यांमध्ये खूप ताणले गेले होते. INDI आघाडीच्या बाजूने संख्याबळ नसताना देखील राहुल गांधींनी सत्ताधारी आघाडीशी संघर्षाची भूमिका घेतली. त्यामुळे लोकसभा सभापती पदाची निवडणूक अपरिहार्य ठरली. त्याचबरोबर आता उपाध्यक्ष पदासाठी देखील विरोधी INDI आघाडीला बार्गेनिंग करता येणार नाही. कारण सत्ताधारी आघाडी आता उपाध्यक्षपदासाठी देखील निवडणूक मागू शकते. इतकेच नाहीतर, आता काँग्रेस किंवा काँग्रेसला अनुकूल ठरणाऱ्या कोणत्याही पक्षाला लोकसभेचे उपाध्यक्ष पद न देता, ते सत्ताधारी पक्षाला अनुकूल ठरेल, अशा एखाद्या घटक पक्षाच्या नेत्याला देण्याचा डाव सत्ताधारी NDA आघाडी खेळू शकते. याचा अर्थ सदनात 240 एवढे विशिष्ट संख्याबळ वाढून देखील त्याचा पुरेपूर लाभ घेत लोकसभेचे उपाध्यक्ष पद पदरात पाडून घेण्यात विरोधक अपयशी ठरले. अर्थातच यातून राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना पेचात पकडण्याची संधी गमावल्याचेही स्पष्ट होते.