विशेष प्रतिनिधी
जयपूर : छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात आपलेच नेते, कार्यकर्ते, विरोधी पक्ष आणि माध्यमांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धक्के देऊन तिथले मुख्यमंत्री बदलले. माध्यमांनी चालवलेली कुठलीच नावे या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवली नाहीत. Now what and how Modi will push in Rajasthan
छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय यांचे नाव काही माध्यमांनी चालवले होते, पण ते मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये आगे मागेच होते. पण मध्य प्रदेश च्या बाबतीत मात्र सगळ्यांचेच अंदाज चुकले. माध्यमे तोंडावर पडली. त्यामुळे आता माध्यमे राजस्थान विषयीच्या अटकळी जरा जपूनच बांधत आहेत अटकळी तेजीत असल्या तरी त्या बिलकुल खात्रीच्या नाहीत, याची “खात्री” “माध्यमवीरांना” छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाने दाखवून दिली आहे!!
मध्य प्रदेशात मावळते मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान नरेंद्र सिंह तोमर प्रल्हाद सिंह पटेल यांच्याबरोबर पाच-सात नावे माध्यमांनी चालवली होती. त्यांचीच नावे स्वतःच्या डोक्याच्या बुद्धिबळाच्या पटावर मांडून तीच प्यादी माध्यमे खेळवत होती. पण प्रत्यक्षात मोदींनी मोहन यादव नावाचा “वजीर” हलवला आणि तो मध्य प्रदेशात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवला त्यामुळे मोदी आता राजस्थानमध्ये महाराणीच्या ऐवजी नेमका दुसरा कोणता “वजीर” बुद्धिबळाच्या पटावरून पटावर हलवतात आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवतात??, याविषयीच्या “सावध” अटकळी तेजीत आल्या आहेत.
राजस्थानात आज माध्यमांनी दिवसभर वसुंधरा राजे यांनी भाजपची ऑफर फेटाळल्याच्या बातम्या चालविल्या. पण भाजपने वसुंधरांना खरंच कुठली ऑफर दिली की नाही?? याची कुठलीही खात्रीपूर्वक माहिती माध्यमांच्या बातम्यांमध्ये नव्हती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हणे, वसुंधरांना विधानसभा अध्यक्ष पदाची ऑफर दिली आणि त्यांनी ती फेटाळली. त्या ऐवजी मला एका वर्षासाठी मुख्यमंत्री करा. मी वर्षभरानंतर ते पद सोडते, अशी प्रतिऑफर वसुंधरांनी भाजप श्रेष्ठींना दिल्याचे बातमीत नमूद होते. परंतु, त्या बातमीत कुठलीही खात्रीपूर्वक माहिती माध्यमे देऊ शकलेली नाहीत.
राजस्थानात वसुंधरा राजेंना बदलले जाणार. त्यांना मोदी मुख्यमंत्री करणार नाहीत. त्यांच्या ऐवजी गजेंद्र सिंह शेखावत, बाबा बालकनाथ, अर्जुन राम मेघवाल आदींची नावे माध्यमांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत चालवली आहेत. पण आता मोदींनी छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये दिलेले धक्के पाहता खुद्द “माध्यमवीरांचाच” आपण चालवलेल्या कुठल्याच नावांवर विश्वास उरलेला नाही. कुठल्याच सूत्रांच्या आधारे कुठलीच माध्यमे राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचे खात्रीचे नाव देऊ शकत नाहीत. त्यामुळे अटकळी तेजीत असल्या तरी त्या खात्रीच्या बिलकुल नाहीत, याची “खात्री” माध्यमांना पटली आहे, ही आजची 11 डिसेंबर 2023 ची वस्तुस्थिती आहे.