नाशिक : इस्रायल विरुद्ध हमास दहशतवादी संघटना या युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी आज दुपारीच पंतप्रधान मोदींना फोन करून हमास विरुद्धच्या युद्धाची अपडेट दिली. Modi’s support for Israel, Vajpayee’s support for Palestine
या पार्श्वभूमीवर भारतातल्या मुस्लिमधार्जिण्या लिबरल्सनी कै. अटल बिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडिओ व्हायरल करून मोदी आणि वाजपेयी यांच्यातला कथित भेद एक्सपोज केल्याचा दावा केला. मोदींनी जरी इस्रायलला पाठिंबा दिला असला, तरी वाजपेयींनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता, याचे धडधडीत असत्य लिबरल्सनी जनतेसमोर पेश केले.
पंतप्रधान मोदींनी इस्रायलला संपूर्ण पाठिंबा दिला हे तर खरेच आहे, पण हे धोरण जनसंघाच्या किंबहुना त्यापूर्वी सावरकरांच्या नेतृत्वाखालच्या हिंदू महासभेचे परराष्ट्र धोरण होते, तेच आक्रमक परराष्ट्र धोरण मोदींनी पुढे चालवत इस्रायलला पाठिंबा दिला आहे.
मग दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी जाहीर केलेल्या पॅलेस्टाईनच्या पाठिंब्याचे नेमके रहस्य काय आहे??, याचा थोडा वस्तुनिष्ठ आढावा घेतला, तर यातले सत्य बाहेर येईल. वाजपेयी राजवटीतले ज्येष्ठ विचारवंत सुधींद्र कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. मूळात हा व्हिडिओ 1977 सालच्या जनता पक्षाच्या राजवटीतला आहे. त्यावेळी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालच्या जनता पक्षाच्या सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी हे परराष्ट्र मंत्री होते. त्यावेळी जनसंघाचे जनता पक्षात विलीनीकरण करण्यात आले होते. त्यामुळे जनसंघाला स्वतंत्र राजकीय अस्तित्व नव्हते. अटल बिहारी वाजपेयी त्यावेळी देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणून पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मार्गदर्शन केलेलेच परराष्ट्र धोरण राबवत होते.
मोरारजी देसाई स्वतः मूळचे काँग्रेसचे नेते असल्याने त्यांचे परराष्ट्र धोरण देखील नेहरूंशी संलग्न असेच पॅलेस्टाईन आणि अरब देशांना पाठिंबा देणारे होते. त्यामुळे मोरारजींच्या सरकारमध्ये राहून वाजपेयींनी जनसंघाचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबविणे शक्यच नव्हते. म्हणून वाजपेयींनी त्यावेळी केलेल्या भाषणात इस्राइलला पाठिंबा न देता पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता.
पण हे सत्य सुधींद्र कुलकर्णी यांनी लपविले आहे.
या उलट एक वास्तविकता अशी की इस्रायल या देशाला अधिकृत मान्यता देण्याचे नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह या सर्वांच्या सरकारांनी टाळले होते, पण माजी पंतप्रधान दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारने इस्रायलला भारताची अधिकृत मान्यता दिली आणि त्यानंतर इस्रायलचा दूतावास भारतात सुरू केला होता. त्यावेळी भारताच्या परराष्ट्र धोरणात पी. व्ही. नरसिंह राव यांनी एक संतुलित बदल केला होता, तो म्हणजे पॅलेस्टाईन आणि अरब राष्ट्रांकडे भारताचा झालेला अतिरिक्त झुकाव टाळून त्यांनी पॅलेस्टाईन – अरब राष्ट्रे आणि इस्रायल यांनी शांततेच्या मार्गाने तोडगा काढावा ही भारताची भूमिका स्पष्ट करून सांगितली होती.
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने देखील नरसिंह राव यांच्याच सरकारचे संतुलित परराष्ट्र धोरण पुढे चालविले होते. वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीतच भारताचे इस्रायलशी संबंध अधिक दृढ झाले.
त्यानंतरच्या युपीए अर्थात सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने इस्रायलची अधिकृत मान्यता काढून घेतली नाही, पण इस्रायलशी विशेष संबंधही राखले नव्हते.
त्या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नरसिंह राव आणि वाजपेयी यांच्या सरकारच्या काळातले संतुलित परराष्ट्र धोरण अधिक आक्रमक करून इस्रायलला पाठिंबा दिला आहे. ही देशाच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित सुसंगत आणि सुस्पष्ट बाब आहे.
पण इस्रायल विरुद्ध हमास या युद्धात स्वरा भास्कर, गौहर खान किंवा अन्य बॉलीवूड सेलिब्रिटीज ज्याप्रमाणे हमास दहशतवादी संघटनेची बाजू उचलून धरली आहे, त्याच धर्तीवर सुधींद्र कुलकर्णी यांच्यासारख्या विचारवंताने केवळ मोदींशी आपले जमत नाही, म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांचा परराष्ट्र मंत्री असताना केलेल्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करून मोठा गैरसमज पसरविला. भारताच्या परराष्ट्र धोरणातली नरसिंह राव – वाजपेयी – मोदी ही आक्रमक सुसंगती कुलकर्णींनी लपविली!!… पण भारतातल्या लिबरल्सच्या मोदीविरोधी धोरणातली मात्र सुसंगती राखली…!!
Modi’s support for Israel, Vajpayee’s support for Palestine
महत्वाच्या बातम्या
- न्यूजक्लिकप्रकरणी प्रबीर-अमित यांच्या याचिकेवर HCचा निर्णय राखीव; UAPA अंतर्गत झाली अटक
- WATCH : चीननेच घडवली अतिरेकी निज्जरची हत्या, अमेरिकेतील मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दाव्याने खळबळ
- छत्तीसगडसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी; तीन खासदारांना तिकीट
- परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, सप्तश्रृंगी गडासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा 531 कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा!!