वृत्तसंस्था
तिरूअनंतपूरम – मंत्रीपदाचा गैरवापर या मुद्द्यावरून तुम्ही मंत्रिपदावर राहण्यास लायक नाही, असे कडक ताशेरे ज्यांच्यावर केरळच्या लोकायुक्तांनी मारले, त्या के. टी. जलील यांना आज अखेर उच्च शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. Kerala Higher Education Minister KT Jaleel resigns from his post
के. टी. जलील यांनी लोकायुक्तांनी ताशेरे मारल्यानंतरही मंत्रीपदावर राहण्याचा भरपूर प्रयत्न केला. ते न्यायालयात जाण्याची भाषाही बोलले. पण प्रत्यक्षात त्यांना मंत्रीपदावर चिकटून राहाता आले नाही.
के. टी. जलील यांना पदाचा गैरवापर करून आपल्याच नातलगांना पदाची खिरापत वाटण्याच्या प्रकरणात केरळच्या लोकायुक्तांनी दोषी ठरवताना ते मंत्रीपदावर राहण्यास लायक नाहीत, अशा कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढले होते. वैशिष्ट्य म्हणजे केरळ विधानसभा निवडणूकीचे मतदान संपल्यानंतर लोकायुक्तांचा रिपोर्ट आला होता.
के. टी. जलील यांच्या विरोधात हा दुसरा मामला होता. आधीच जलील यांना सोने तस्करी मामल्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने तपास आणि चौकशीसाठी समन्स देऊन बोलावले होते.
लोकायुक्तांनी ताशेरे मारलेला मामला केरळच्या अल्पसंख्याक विकास वित्त निगमच्या महाप्रबंधक पदावर के. टी. अदीब या आपल्याच नातेवाईकाची वर्णी लावल्याबद्दलचा आहे. जलील यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून अल्पसंख्याक विकास वित्त निगमच्या जनरल मॅनेजरपदाच्या नियुक्तीचे निकषही बदलून टाकल्याबद्दल त्यांना लोकायुक्तांनी दोषी ठरविले.
लोकायुक्त सायरिक जोसेफ आणि उपलोकायुक्त हरून अल रशीद या दोघांनी एकमताने के. टी. जलील यांना पदाच्या गैरवापराबद्दल दोषी ठरवून त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे ताशेरे मारले. जलील यांच्या बाबतचा रिपोर्ट लोकायुक्त जोसेफ यांनी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांना पाठवून दिला.
सोने तस्करी प्रकरणातही नाव
के. टी. जलील हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले असले तरी मूळचे ते मुस्लीम लीगच्या मुस्लीम स्टुडंट फेडरेशनचे नेते आहेत. ते सध्या केरळच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संलग्न आमदार म्हणून विधानसभेत बसतात. सोने तस्करी प्रकरणातही त्यांचे नाव आले आहे.
लोकायुक्तांचा निकाल आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी ताबडतोब के. टी. जलील यांचा राजीनामा मागितला. त्याचबरोबर केरळ विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर हा रिपोर्ट येण्याकडेही दोन्ही पक्षांनी लक्ष वेधले. पण आपण वकीलांशी सल्लामसलत करून पुढचे राजकीय पाऊल उचलणार असल्याचे जलील यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात तसे घड़ले नाही. त्यांना आज राजीनामाच द्यावा लागला आहे.