मुख्यमंत्री आतिशी यांचीही प्रतिक्रिया आली आहे समोर, जाणून घ्या नेमकं काय म्हणल्या आहेत?
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : दिल्लीत राजकारण तापत असताना, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला आहे की भाजप त्यांच्या उमेदवारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आतापर्यंत भाजपने त्यांच्या १६ उमेदवारांना बोलावले आहे. त्यांना भाजपमध्ये सामील होण्यासाठी आमिष दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
उमेदवारांना आप सोडून भाजपमध्ये येण्याचे सांगितले जात आहे. तुम्हाला मंत्री बनवू आणि प्रत्येकी १५ कोटी रुपये देवू. असा आरोप केजरीवालांनी केला आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, काही एजन्सी भाजपला ५५ पेक्षा जास्त जागा मिळत असल्याचे दाखवत आहेत. जर जास्त जागा येत असतील तर आपचे उमेदवार बोलावण्याची काय गरज आहे. सर्व सर्वेक्षणे बनावट आहेत. याद्वारे दिल्लीत वातावरण निर्माण करून ‘आप’ उमेदवारांना हेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्याचवेळी, मुख्यमंत्री आतिशी यांनीही X वर पोस्ट करून भाजपवर निशाणा साधला आहे. एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, जर गैरवर्तन करणाऱ्या पक्षाला ५० पेक्षा जास्त जागा मिळत असतील, तर ते आमच्या उमेदवारांशी संपर्क साधून त्यांना तोडण्याचा प्रयत्न का करत आहेत? यावरून एक्झिट पोल हे आम आदमी पक्षाचे आमदार फोडण्यासाठी एक षड्यंत्र असल्याचे दिसून येते.