वृत्तसंस्था
व्हिएन्ना : ही युद्धाची वेळ नाही. परस्पर संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याची आहे, असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेन आणि पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान केला. व्हिएन्नात बुधवारी मोदी ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले, दोन्ही देश जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहेत.Indian PM in Austria after 41 years; Said – this is the time for world peace
पंतप्रधान मोदींनी चान्सलर नेहमर यांच्याशी पायाभूत सुविधांचा विकास, अक्षय ऊर्जा व आर्टिफिशियल इंजेलिजन्सच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर सविस्तर चर्चा केली. मोदींनी रशिया दौऱ्यातही राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या समक्ष युक्रेन युद्धासंदर्भात सांगितले होते की, युद्धाच्या मैदानातून शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. मोदी ४१ वर्षांनंतर ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर येणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. १९८३ मध्ये इंदिरा गांधी ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आल्या होत्या.
जगात भारताची ख्याती – चान्सलर नेहमर
चान्सलर कार्ल नेहमर म्हणाले, सर्वात मोठा लोकशाही देश भारताची जगभरात ख्याती आहे. ग्लोबल साउथचा सर्वात प्रभावी देश भारत शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. युक्रेन युद्ध संपवण्यासाठी स्विस शांतता परिषदेतही भारत सक्रिय आहे.
ऑस्ट्रियात वंदे मातरमच्या स्वरांनी केले मोदींचे स्वागत
ऑस्ट्रियाच्या आॅर्केस्ट्राने मोदींचे स्वागत वंदे मातरमच्या स्वरांनी केले. याचे नेतृत्व व्हिएन्नाच्या फिलहार्मोनी विद्यापीठाचे संचालक व मूळ लखनऊचे विजय उपाध्याय यांनी केले. तत्पूर्वी मोदींचे रेड कार्पेट स्वागतही झाले. माेदींनी ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वान डेर यांचीही भेट घेतली.
युक्रेन युद्ध थांबवण्यात भारताने आपल्या प्रभावाचा वापर करावा – अमेरिका :
अमेरिकेने सांगितले की, युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने आपल्या प्रभावाचा वापर करावा. व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव कॅरीन ज्यां पियरे म्हणाले, भारताचे रशियासोबत चांगले संबंध आहेत. भारत रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर युद्ध संपवण्याचा दबाव टाकू शकतो. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर आणि पेंटॅगॉनचे प्रेस सचिव पेट रायडर म्हणाले, रशियासोबत संबंध असतानाही भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार म्हणून कायम राहील.