वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : 18 व्या शतकातील जगातली एक चतुर्थांश अर्थव्यवस्था ते 21व्या शतकात प्रगत अशा ब्रिटनला मागे टाकून जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था ही भारताची “ग्रोथ स्टोरी” सांगितली आहे, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी!! निमित्त होते, संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेचे आणि भारत – संयुक्त राष्ट्र संघ सहकार्य परिषदेचे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचे या परिषदेत महत्त्वपूर्ण भाषण झाले. त्यांनी भारताची विविध वळणांनी पुढे सरकलेली “ग्रोथ स्टोरी” सांगितली. India showcases its growth story at 77th Session of UNGA
गुलामी ते आत्मनिर्भर भारत
एस. जयशंकर म्हणाले, की 18 व्या शतकात भारत जगातले एक समृद्ध राष्ट्र होते. किंबहुना जगातल्या संपत्तीचा एक चतुर्थांश भाग भारतामध्ये होता. याचा अर्थ भारत जगातली एक चतुर्थांश म्हणजे जगातली पहिल्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था होती. परंतु, 18 व्या शतकाच्या अखेरीस आणि 19 व्या शतकाच्या सुरुवातीला भारत गुलामीत अडकला आणि भारताचे ऱ्हास पर्व सुरू झाले. भारत जागतिक अर्थव्यवस्थेतून जवळजवळ बाहेर फेकला गेला.
स्वातंत्र्याच्या शताब्दीत प्रगत भारताचे ध्येय
परंतु, भारतीयांनी सातत्याने संघर्ष करून देशाला गुलामीतून बाहेर काढले आणि गेल्या 75 वर्षांमध्ये कष्टपूर्वक प्रयत्नातून भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत पुन्हा एकदा मानाचे स्थान मिळवून दिले आहे. भारत आज जगातली पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतीयांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर ही सर्वोत्तम कामगिरी करून दाखविली आहे. सन 19 सन 2047 मध्ये भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी होत असताना जगातली प्रगत अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय व्हावा हे आमचे ध्येय आहे, असेही एस जयशंकर शंकर यांनी स्पष्ट केले आहे.
80 कोटी लोकांना अन्नसुरक्षेतून रेशन
भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या 75 वर्षात नेमकी कोणती कामगिरी बजावली?, याचा उल्लेख करताना जयशंकर म्हणाले, की नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून भारतीयांनी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पण विकसित केले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे तब्बल 80 कोटी भारतीयांना अन्नसुरक्षा कार्यक्रमांतर्गत रेशन पुरविण्यात आले आहे.
डिजिटल अर्थव्यवस्था
भारताची डिजिटल अर्थव्यवस्था अत्यंत वेगाने वाढते आहे. तंत्रज्ञानाच्या निर्मितीपासून वापरापर्यंत जागतिक पातळीवर सर्व क्षेत्रांमध्ये भारतीय आघाडीवर आहेत. देशात सर्वदूर पसरलेल्या गावांमध्ये देखील अर्थव्यवस्थेपासून समाजव्यवस्थेपर्यंत सगळीकडे डिजिटल तंत्रज्ञान वापराचा आमचा आग्रह आहे. त्याचबरोबर त्यासाठी मोठे इन्फ्रास्ट्रक्चर देखील उभारले जात आहे. 2047 च्या स्वातंत्र्याच्या शताब्दी महोत्सवात भारत प्रगत अर्थव्यवस्थेचे सर्व निकष पूर्ण करून जागतिक पातळीवर प्रगत देश म्हणून उभा असेल, असा विश्वासही एस. जयशंकर यांनी व्यक्त केला आहे.